चंद्रपूर : केंद्रातील सत्ताधारी एका विशिष्ट विचाराने कारभार करीत आहेत. त्यामुळे देशाची सध्या वेगळ्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सर्वसामान्य जनतेला गृहित धरले जात आहे. परंतु, २०२४ ची निवडणूक ही आपल्या सर्वांसाठी एक संधी म्हणून आली आहे. या निवडणुकीत सुजान नागरिकांनी आपल्या अधिकार, हक्कासाठी मतदान करणे अपेक्षित आहे. अन्यथा २०२४ ची निवडणूक ही शेवटची ठरणार असून, यानंतर देशात हुकुमशाही वाढेल, अशी भीती प्रसिद्ध वक्त्या तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली.
चंद्रपूर येथील न्यू इंग्लिश ग्राऊंडवर बहुजन समता पर्वाचा दुसऱ्या सत्रात बुधवारी (ता. १२) त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी बहुजन समता पर्वचे सचिव कोमल खोब्रागडे, तर मंचावर प्रसिद्ध शिवचरित्र अभ्यासक शेख सुभान अली उपस्थित होते.
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आहे. त्यामुळेच प्रत्येक नागरिक आपले म्हणणे छातीठोकपणे मांडू शकत आहे. परंतु, सध्या देशातील सत्ताधारी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करीत आहेत. साध्या सोशल मीडियावर सत्य मांडले, तरी त्यावर निर्बंध आणले जात आहे. त्यामुळे माझे म्हणणे मांडू न दिल्यास मी गप्प बसणार नाही. मी या विरोधात आवाज बुलंद करीत राहील. देशातील नागरिकांनीसुद्धा संविधानिक चौकट वाचवायची असेल, तर आता निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे संविधानाचा पाईक म्हणून सामोरे जाणार की नाही, हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे.
प्रास्ताविक प्रा. अनिल डहाके यांनी केले. कार्यक्रमाला आयोजन समितीचे स्वागताध्यक्ष डॉ. दिलीप कांबळे, अध्यक्ष डॉ. संजय घाटे, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. इसादास भडके, कोषाध्यक्ष डॉ. राजू शेंडे, नरेन गेडाम, नाना देवगडे, डॉ. दादा वासनिक, सूर्यकांत खनके, शशिकांत महेशगौरी, प्रा. दिलीप चौधरी, डॉ. विवेक शिंदे, इंजि. दीपक खामनकर, बबनराव वानखेडे, अशोक घोटेकर, डॉ. विनोद महुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन संगीता मानकर-डांगे यांनी, तर आभार सूरज दहागावकर यांनी मानले.