चंद्रपूर: परिस्थिती माणसाला खचवू शकते, हतबल करू शकते पण संघर्ष करण्याची हिंमत असेल तर माणसाला परिस्थिती कधीच संपवू शकत नाही याचा वस्तुपाठ समाजाला घालून देणाऱ्या विसापूर येथील श्रीमती गीता डांगे यांचा विचारज्योत फाऊंडेशन, चंद्रपूर तर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सन्मानित करण्यात आले.
गीता डांगे यांचे वयाच्या सोळाव्या वर्षी लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांना तीन मुली आणि एक मुलगा अशी चार अपत्ये जन्माला आली. घरची परिस्थिती खूप हालाखीची होती. घरामध्ये अठराविश्वे दारिद्र्य. अशातच पतीचे अकाली निधन झाले. त्यामुळे चारही मुलांची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली. मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्या मिळेल ते काम करू लागल्या.
पुढे हातगाडीवर भाजीपाला विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यातून त्यांनी आपल्या मुलांना शिकविले आणि घडविले. आज त्यांची एक मुलगी पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. लहान मुलगा अग्निवीर म्हणून भारतीय सैन्य दलामध्ये आहे आणि लहान मुलगी चंद्रपूर पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीमध्ये पास होऊन लेखी परीक्षेसाठी पात्र ठरली आहे.
आयुष्याच्या प्रवासात अनेक संकटे आली तरीही गीता डांगे यांनी हिंमतीने संकटाना सामोरे गेल्या. वडिलांची उणीव त्यांनी कधीही आपल्या मुलांना भासू दिली नाही. मुलांना चांगल्या शिक्षणासोबत चांगले संस्कार दिले. अशा या कर्तबगार आदर्श अशा माऊलीच्या मातृत्वाची, कर्तुत्वाची, नेतृत्वाची, त्यागाची, कष्टाची आणि समर्पणाची दखल घेऊन विचारज्योत फाऊंडेशन, चंद्रपूर तर्फे सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी विचारज्योत फाउंडेशन चंद्रपूर चे संस्थापक अध्यक्ष सुरज पी दहागावकर, सचिव मुन्ना तावाडे, प्रलय म्हाशाखेत्री, आकाश कडूकर, रेखा रामटेके, सुधाकर रामटेके, विशाल शेंडे, कैलास दुर्योधन, नीता डांगे, देवानंद झोडे, अनिता झोडे, प्रीती डांगे, शकुंतला झोडे, सुनील डोर्लीकर, शिवाजी गोरघाटे आणि विजय कांबळे उपस्थित होते.