बळीराम काळे,जिवती
जिवती (ता.प्र.) : चंद्रपूर जिल्ह्यात एक असेही घर आहे त्या घरातील स्वयंपाक घर तेलंगणात तर बैठक खोली महाराष्ट्रात आहे. अशा या अनोख्या घरांची सद्या तुफान चर्चा आहे. ऐकायला जरी नवल वाटत असेल तरी हे सत्य आहे. महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमावादात अडकलेल्या या घराची विभागणी दोन्ही राज्यात झाली आहे. दहा खोल्यांचे हे घर अर्धे तेलंगणात आहे तर अर्धे महाराष्ट्रात आहे. सीमावादात अडकलेल्या १४ गावापैकी महाराजगुडा या गावात पवार कुटुंबीय त्या घरात वास्तव्यास आहेत.
तेलंगणा सरकारने राज्याची सीमा निर्धारित केली ही सीमा गावाच्या मध्यभागातून गेल्यामुळे अर्धे गाव तेलंगणा आणि अर्धे गाव महाराष्ट्र राज्यात आले आहे. दोन राज्याच्या सीमावादात केवळ गावालाच विभागले नसून एका घरालाही विभागले आहे. पवार भावंडाच घर विभागून चंदू देवसिंग पवार यांचे घर तेलंगणात तर उत्तम देवसिंग पवार यांचे महाराष्ट्रात आले आहे. विशेष म्हणजे याच घरातील स्वयंपाक रूम तेलंगणात तर बैठक रूम महाराष्ट्रात आली आहे. तसेच त्याच गावातील गणेश शत्रू जाधव यांच्या घराचा समोरचा भाग तेलंगणा आणि मागचा भाग महाराष्ट्रात आल्याचे गावकरी सांगतात. तेलंगणा सरकारने सीमा निश्चिती केली असली तरी यास मान्यता नाही.
सीमावादात अडकलेल्या १४ गावांपैकी महाराजगुडा हे एक गाव आहे. या गावावर तेलंगणा व महाराष्ट्र सरकार अधिकार सांगतात या गावात दोन्ही राज्याच्या अंगणवाडी, शाळा, ग्राम पंचायत आहेत व कल्याणकारी योजना पण राबवितात. एकाच ठिकाणचे नागरिक दोन राज्यात मतदान करतात हे उदाहरण देशात महाराजगूडा या गावासह सीमावादात अडकलेल्या १४ गावात पहायला मिळते. तेलंगणा सरकारकडून काही जनाला शेतीचे पट्टेही देऊन त्यावर लाभ देणे सुरू आहे तसेच तेलंगणा सरकारने भरीव विकासकामे केल्याचेही गावकरी सांगतात व विविध योजनांचा लाभही नागरिक घेताना दिसून येते. त्यामुळे गावातील काही जणांचा तेलंगणाकडे जाण्याचा कल आहे. मात्र जे सरकार शेतीचे पट्टे देतील तिथे राहू असेही गावकरी सांगतात.