चंद्रपूर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे संरक्षण याबाबत आमची सकारात्मक भूमिका आहेच. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून यात अनेकांचा बळी गेला आहे. अशातच वनविभाग प्रशासन व वनमंत्री हे मानव – वन्यजीव संघर्षातून होणारी जीवितहानी टाळण्या ऐवजी मानवी जीवनाची पैशात किंमत मोजून थट्टा करीत आहे. जिल्ह्यातील मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनांना पायाबंद न घातल्यास वन मंत्र्यांच्या घरापुढे ढोल बजाव आंदोलन करून निषेध नोंदविणार असा इशारा राज्याची माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
सर्व दूर औद्योगिक जिल्हा म्हणून परिचित असलेला चंद्रपूर जिल्हा वनसंपदेने नटलेला असून येथील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची ख्याती सात समुद्रापार पर्यंत पोहोचलेली आहे. ताडोबा पर्यटन स्थळ देशी विदेशी पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत असले तरीही व्याघ्र प्रकल्प सोबतच वनालगतच असलेल्या गावांना मात्र येथील वन्यजीव काळ ठरत आहे. तत्पूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये मी पालकमंत्री असताना टायगर सफारी व रेस्क्यू सेंटर याकरिता 275 कोटी रुपयांची तरतूद केली होती. जेणेकरून या उपाययोजनांमुळे मानव वन्यजीव संघर्ष टाळता यावे यासारखे विशेष महत्वपूर्ण प्रयत्न चालविले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या विक्रमी स्वरूपात आहे. यामुळे जिल्ह्यातील विविध शहरी व ग्रामीण भागात तसेच शेतशिवार, मानव वस्तीत वाघाचे भ्रमण यामुळे सर्वत्र दहशत पसरली असून दैनंदिन हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. अशातच आठवड्यातून किमान दोन हल्ल्यात मनुष्यांना प्राणास मुकावे लागत असल्याच्या ताज्या घटना आहे. आजवर जिल्ह्यात हिस्त्र पशुच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या शेकडोंच्या घरात पोहोचली आहे. वन विभाग प्रशासन व जिल्ह्याचे स्थानिक पालकमंत्री तथा वनमंत्री यांनी हिस्त्र पशु हल्ल्यात मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना केवळ आर्थिक मदती पलीकडे काहीच केले नाही. यावर प्रशासनाला माणूस महत्त्वाचा किंवा वाघ ? असा प्रश्न यावेळी आ.वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. तसेच मानवी जीवाचे मूल्य पैशाच्या तराजूत तोलण्याचे निष्ठूर व निर्दयी कार्य सरकार करून चालविल्या जात असल्याची टीका राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आ. विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तद्वतच जिल्ह्यात मानव – वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या संपूर्ण घटनांना वनमंत्री व वन प्रशासन यांची निष्क्रियता कारणीभूत असल्याचेही यावेळी माजी मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले . जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आरक्षित वन व इतर वनालगत गावातील मानव – वन्यजीव संघर्ष यातून होणारी जीवितहानी याला विशेष उपाययोजनेतून आळा न घातल्यास नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी तद्वतच निष्क्रिय वन प्रशासनाला कुंभकर्णी झोपेतून उठविण्यासाठी रस्त्यावर उतरून राज्याच्या वनमंत्र्यांच्या घरापुढे ढोल बजाओ आंदोलन करणार असा कणखर इशारा राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.