जिवती : राज्यात जवळपास २७००० संगणक परिचालक मागील ११ वर्षांपासून ग्राम पंचायत येथे सर्व ऑनलाईन तथा ऑफलाईन कामे तसेच नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा जबाबदारीने पूर्ण करीत आहेत. परंतु ११ वर्षांपासून महागाई वाढत चालली परंतु संगणक परीचालकांच्या मानधनात मात्र वाढ झालीच नाही. संगणक परिचालक यांची पदनिश्चिती करून कायमस्वरूपी करण्यात यावे व त्यांच्या मानधनात वाढ करावी अशा मागणीचे निवेदन वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करून संगणक परिचालक संघटना चंद्रपूर च्या वतीने देण्यात आले असता संगणक परिचालक यांच्या मानधन वाढीबद्दल सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी दिले.
डिजीटल इंडिया व डिजिटल महाराष्ट्र करण्याच्या हेतूने केंद्र सरकार तसेच राज्य सरकार प्रयत्नशिल असून त्याचे मुख्य दुवा म्हणून संगणक परिचालक ग्रामीण पातळीवर संपूर्ण राज्यात महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून २०११ पासून सर्व ग्रामपंचायत स्तरावर कामे करीत आहेत. मात्र,पाठपुरावा करूनही आज पर्यंतच्या सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित असल्याने त्यांची पिळवणूक होताना दिसून येत आहे.
मुळात संगणक परिचालक हा ग्रामीण भागातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगार आहे. दिवसेंदिवस वाढत्या महागाईच्या काळात तुटपुंज्या मानधनावर काम करून स्वतःचा व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा करीत आहेत. महागाईच्या काळात जगणे कठीण झाले आहे. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी चर्चेत म्हटले की, तुमचा प्रश्न मला माहिती आहे. तुमच्या मागणीवर मंत्रालयात वरिष्ठ अधिकारी यांना सोबत घेऊन, न्यायालयीन निर्णय बघून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, मात्र तुमच्या मानधन वाढिबद्दल मी सकारात्मक आहे असे त्यांनी उपस्थित असलेल्या संगणक परिचालकांना आश्वासन दिले आहे.
संगणक परिचालक संघटना जिल्हा शाखेच्या वतीने भाऊ चा सत्कार आणि स्वागत करण्यात आले. यावेळी चंद्रपूरचे माजी जिल्हा अध्यक्ष, संजय बोरकर, धनराज रामटेके, चंदू झगडकर, दिपक साबने, विकास खोब्रागडे, राजू सहारे, विवेक डोर्लीकर, दिनेश मांदाळे, प्रमोद मेश्राम, विनोद कोमलवार, वामन नागापुरे, हेमंत भुरसे, विनोद जीवतोडे, लीलाधर गुरनुले, कृष्णा गदेकार, गणेश भोयर, गणेश तलमले, आदी उपस्थित होते