बळीराम काळे,जिवती
जिवती(ता.प्र) : चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासी बहुल व मिनी मराठवाडा अशी ओळख असलेल्या जिवती तालुक्याच्या दक्षिण व पश्चिम भागाला तेलंगणा राज्याची सीमा लागून आहे. जिवती तालुक्यातील प्रवाशांना मराठवाड्यात नांदेड, परभणी, बीड, लातूर येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी तसेच इतर कामाकरिता जाण्यासाठी जिवती येल्लापूर मार्गे आदीलाबाद हा मार्ग कमी अंतराचा असल्यामुळे जिवती तालुक्यातील नागरिकांना तेलंगणा सरकारच्या उटनूर आणि आदीलाबाद आगाराच्या बसेस खूप उपयोगी पडत आहेत.
तेलंगणा सरकारच्या आदीलाबाद व उटनूर आगाराच्या बसेस जिवती तालुक्यात दररोज सकाळी दुपारी सायंकाळी व रात्री अशा दिवसातून चार वेळा सुरू आहेत. उटनूर आगाराच्या येल्लापूर-जिवती-शेणगाव मार्गे सुरू असलेली तेलंगणा सरकारची बस पूर्ण उटनूर डेपो मध्ये जास्त कमाई करणारी बस आहे असे बोलल्या जाते. तालुक्याला सीमा लागून असल्याचा फायदा तेलंगणा सरकार उचलत आहे परिणामी महाराष्ट्र शासनाचा महसूल तेलंगणा सरकारच्या घशात जात आहे.
महाराष्ट्र शासनाने आपली लालपरी राजुरा-जिवती-येल्लापूर-गादिगुडा-आदीलाबाद मार्गाने सुरू करून मिनी मराठवाडा म्हणून ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील नागरिकांना कमी वेळात मराठवाड्यात जाण्याकरिता सोयीचे करावे सोबतच महाराष्ट्र शासनाच्या महसुलात नक्कीच वाढ करून घ्यावे.अशा आशयाचे निवेदन तहसीलदार जिवती यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तसेच विभागीय नियंत्रक, चंद्रपूर याना दिपक साबने,सामाजिक कार्यकर्ता,जिवती यांनी दिले. यावेळी बळीराम काळे, डॉ. ईश्वर गायकवाड, सुबोध चिकटे इत्यादी उपस्थित होते.