चंद्रपुर: गेल्या पंधरवड्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अतिवृष्टी व नदीना आलेला महापूर यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली येऊन यात शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. देशाच्या अन्नदात्यावर कोसळलेले हे संकट दूर करण्यासाठी काँग्रेस पक्ष यथा शक्ती मदत करीत असून शासनाने पूरग्रस्त भागाचे वस्तुनिष्ठ पंचनामे जलद गतीने करून शासनाकडे अहवाल पाठवा असे निर्देश ब्रह्मपुरी येथील विश्रामगृहात पार पडलेल्या आढावा बैठकीत राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री ,काँग्रेस नेते आ.विजय वडेट्टीवार यांनी दिले..
याप्रसंगी प्रामुख्याने ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, तहसीलदार उषा चौधरी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल कंकाळ, पं.स. गटविकास अधिकारी संजय पुरी, महावितरणचे उपविभागीय अभियंता लिखार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता कोहळे, कनिष्ठ अभियंता कुंभारे, तालुका कृषी अधिकारी खंडाळे उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलताना आमदार वडेट्टीवार म्हणाले की, संपूर्ण राज्यातच अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली या आसमानी संकटामुळे नद्या नाल्यांना पूर आला व शेतकऱ्यांची उभे पिके उध्वस्त झाली. अशा विदारक परिस्थितीत काँग्रेस पक्षाचे वतीने संपूर्ण पूरग्रस्त भागात पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व न्याय मिळवून देण्यासाठी पूरग्रस्त भागांची पाहणी सुरू असून याचा अहवाल लवकरच विधानसभेत मांडून तात्काळ आर्थिक मदत मंजूर करणे हेतू यशस्वी प्रयत्न चालविला जात आहे असेही ते म्हणाले.
ब्रह्मपुरी मतदार संघात झालेल्या पूरग्रस्त व नुकसानग्रस्त भागाचे योग्य पंचनामे करून नागरिकांना मदत करावी अशी सूचना करण्यात आल्या. तसेच पूर परिस्थिती नंतर ग्राम खेड्यांमध्ये येणाऱ्या रोगराई व संसर्गजन्य रोगांपासून नागरिकांचा बचाव करणे हेतू प्रशासनाने खबरदारी बाळगावी अशही सूचना देण्यात आल्या. यावेळी ब्रह्मपुरी तालुक्यातील बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते व जनसामान्य नागरिक उपस्थित होते.