Home वाशीम राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रम उपराष्ट्रीय दाव्यांच्या पडताळणीसाठी सर्वेक्षण

राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रम उपराष्ट्रीय दाव्यांच्या पडताळणीसाठी सर्वेक्षण

340

वाशिम  : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने २०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचे महत्वाकांक्षी धोरण निश्चित केले आहे. नवीन टीबी केसेस कमी करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. अद्ययावत टीबी केसेसच्या आकडेवारीनुसार देशात टीबीच्या प्रमाणात बऱ्याच दृष्टीने तफावत आहे. जिल्हा पातळीवरून टीबी दूरीकरणासाठी करण्यात येणारे प्रयत्न देखील अनेक प्रकारचे आहेत. टीबी मुक्त जिल्हा म्हणून दर्जा मिळविल्यास त्यांना आर्थिक किंवा आर्थिकेतर बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. सन २०१५ पासून व एसडीजीच्या नियमांनुसार टीबी प्रसारणाचा दर ८० टक्केपेक्षा कमी करणे गरजेचा आहे.

आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने या उपक्रमातंर्गत राज्य व जिल्हे अशा पुरस्कारासाठी दावे किंवा अर्ज मागविलेले आहेत. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १२ जिल्हयांमध्ये वाशिम जिल्हयाचा समावेश आहे. वाशिम जिल्हयाने केलेल्या दाव्याची/अर्जाची पडताळणी करण्यासाठी केंद्रीय क्षयरोग विभागाने इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ एपिडिमियोलॉजी आयसीएमआर-एनआयई यांना अहवाल सोपविला आहे. जिल्हयाने केलेले दावे पडताळण्यासाठी बॅक्टेरियोलॉजिकली पॉझिटिव्ह पल्मोनरी क्षयरोगाचे प्रसारणाचा अंदाज घेणे व पूर्वी समाजात आणि सदयस्थितीत एटीटी अंतर्गतही पडताळणी करणे, तसेच जिल्हयातील सर्वच तालुक्यात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद तसेच राष्ट्रीय क्षयरोग अनुसंधान केंद्र नवी दिल्ली या संस्थेकडून येणारे पथक हे सर्वेक्षण करणार आहे.

यासाठी दहा चमुची निवड करण्यात आली आहे. सर्वेक्षण होणारी ठिकाणे पुढीलप्रमाणे. वाशिम मधील वार्ड क्रमांक 15 व सोनखास, मंगरुळपीरमधील वार्ड क्रमांक 3 व सेलगाव, रिसोडमधील वार्ड क्रमांक 10 व चिखली, मालेगाव मधील मुंगळा कारंजामधील वार्ड क्रमांक 2 व उंबर्डाबाजार आणि मानोरामधील देऊरवाडीची निवड करण्यात आली आहे. निवडलेल्या खेडयातील रहिवाशी व तेथील समुदाय यांचे सर्वेक्षण होणार आहे. निवडलेल्या समूह गाव/ वार्ड मधील सर्व घरांची यादी मॅप केली आहे. सर्वेक्षण सुरु करण्यासाठी समावेशक निकष पध्दतीने नमुना निवड केली जाईल. सर्वेक्षणातील आरंभ बिंदूपासून कुटुंबांना गृहित न धरता सर्वेक्षण सुरु केले जाईल.

क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाला जिल्हयातील नागरीकांनी सहकार्य करुन एकजुटिने हातभार लावावा यामुळे ‘टीबी हारेल, देश जिंकेल’ असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटीच्या अध्यक्षा वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विजय काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे व जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटीचे सदस्य सचिव तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. व्ही. देशपांडे यांनी केले आहे.

Don`t copy text!