नागेश इटेकर,प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाच्या राजुरा आगारातील कर्मचारी गेल्या सत्तर दिवसांपासून संपावर आहेत. कर्मचारी एकजुटीने संपात सहभागी असून बऱ्याच कालावधी नंतर काल पहिली एसटी चंद्रपूर कडे रवाना झाली. यावेळी आगारातून निघताना संपकरी कर्मचार्यांनी या बसचा मार्ग रोखला आणि यावेळी येथे तणाव निर्माण झाला. मात्र पोलीस आल्यानंतर त्यांनी या बसला सुखरूप बाहेर काढून राजुरा बस स्थानकावर पाठविले. तेथून ही बस चंद्रपूर ला रवाना झाली. आज मात्र राजुरा आगारातील शेकडो संपकरी एस. टी. कर्मचाऱ्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री यांना पोस्टकार्ड द्वारे विलिनीकरण ची मागणी केली. संपामुळे एस. टी. कर्मचाऱ्यां कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून घरात अन्नधान्य खायला नसल्याने मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन विलिनीकरण करावे असे भावनिक आवाहन केले आहे.
कोणत्याही कामागार संघटनेशिवाय एस. टी. कर्मचाऱ्यांनी एकजूटीने हा संप पुकारला. “अभी नही तो कभी नही ” अशी आरपार ची लढाई सुरु आहे. सरकार विरुद्ध एस. टी. कर्मचारी आपल्या न्याय मागण्या घेऊन लढत आहेत. त्यातच सेवा समाप्ती, निलंबन, बदल्या करणे असे विविध कार्यवाहीचे बडगे उभारून संप मोडणायाचा प्रयत्न सरकार करीत आहे. परंतु कुठल्याही कार्यवाहिला न घाबरता हे एस. टी. कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून हालअपेष्ठा सहन करून आपल्या मागण्यांनावर ठामपणे उभे आहे. व विलिनीकरणाशिवाय संप मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे. परंतु दुसरीकडे आर्थिक विवंचनेचा मोठा फटका या कर्मचाऱ्यांना बसला असून त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आज पत्र लिहून आपल्या परिवारच्या होत असलेल्या हालअपेष्टा त्यात लिहून आतातरी विलिनीकरण करा अशी आर्त हाक दिली आहे. त्यांच्या या मागणी व पत्राला राज्याचे मुख्यमंत्री दाद देतात काय याकडे सर्व एस. टी. कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.