चंद्रपूर : जिल्ह्यातील मूल तालुक्यातील मुख्य व्यवसाय हा कृषी आहे. या भागात मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक धानाची शेती करतात. या भागात मोठ्या प्रमाणात युवक बेरोजगार आहेत. तालुक्यातील मरेगांव एम.आय.डी.सी येथे मोठे तीन उद्योग आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्थानिक युवकांना रोजगार देण्यात यावा तसेच उद्योगाकडून थकीत कराचा भरणा, सी. एस. आर मधून विकास कामे व प्रदूषण उपाययोजना करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्रुत वरखेडकर यांना केल्या.
यावेळी माजी आमदार देवराव भांडेकर, सरपंच लक्ष्मी लाडवे, स्वप्नील राठोड, आकाश वाकुडकर, ज्योत्सना पेंदोर, मनोज अग्रवाल, मनीष रक्षमवार यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मूल हे मरेगांव ग्रामपंचायत च्या हद्दीत आहे. या ठिकाणी पृथ्वी फेरो अलॉय प्रा. ली. व ग्रेटा एनर्जी प्रा. ली. राजुरी स्टील व अन्य कारखाने असून परिसरातील ग्रामस्थांना प्रदूषणाचा फार त्रास होत आहे. या कारखान्यातून वाफ सोडतांना प्रचंड ध्वनी प्रदूषण होते. या वेळेस मोबाईल संभाषण देखील होते कठीण असते. त्यासोबतच येथून निघणारे रसायनयुक्त पाणी, सांडपाणी शेतकऱ्यांच्या थेट शेतात येत आहे. त्यामुळे शेतमालाचे नुकसान व मनुष्य, पाळीव प्राणी तसेच वन्यजीव यांचे आरोग्यावर परिणाम होत आहे. या उद्योगामुळे मरेगांव, आसापूर, चिमडा हि गावे प्रभावित आहेत. मरेगांव ग्राम पंचायतीला आजवर कराचा भरणा या उद्योगाकडून झालेला नाही. सामाजिक दायित्व निधी अंतर्गत देखील या परिसरात कामे झालेली नाही. त्यामुळे त्वरित या उद्योगाकडून वरील कामे करण्याचे आदेश कंपनी व्यवस्थापनाला प्रशासनाला दिले आहे.