नागेश इटेकर,सह संपादक
राजुरा : शहराच्या सीमेलगत असलेल्या रामपूर मौजातील वैरागडे कुटुंबात आपसी वादात असलेल्या एका शेत जमिनीचा निकाल तब्बल 28 वर्षानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने दिला असून संबंधित वैरागडे वारसदारांनी या 2 एकर जागेचा आज (दि. ३) जमिनीचा कब्जा घेतला आहे. या निकालामुळे परस्पर शेत जमिनीचे तुकडे करून विकणाऱ्या कथित महाभागांना न्यायालयांनी चांगलाच दणका दिला आहे.
राजुरा शहरातील नाका नंबर ३ लगतच्या व भवानी मंदिराच्या समोरील गडचांदूर रोड ला लागून असलेल्या सर्वे क्रमांक 30/2 मधील दोन एकर आराजी असलेल्या शेत जमिनीचा वाद वैरागडे कुटुंबामध्ये सुरू होता . यामध्ये मयत भगिरताबाई भगवान वैरागडे यांचे वारसदार विजय भगवान वैरागडे, सुनंदा प्रकाश कुंभालकर, सुनीता पुरुषोत्तम खोब्रागडे व मयत लक्ष्मण भगवान वैरागडे यांचे वारसदार सुरेखा लक्ष्मण वैरागडे व मदन लक्ष्मण वैरागडे यांनी बाळकृष्ण भगवान वैरागडे व इतर यांच्या विरोधात जिल्हा सत्र न्यायालयात दिवाणी दावा सन 1993-94 वर्षात दाखल केला होता. मिळालेल्या माहिती नुसार, बाळकृष्ण वैरागडे यांनी काही लोकांना करारनामा करून दिल्याची चर्चा आहे, सद्यस्थितीत त्याठिकाणी अठरा निवासी व वाणिज्य वापरात असलेल्या इमारती दिसून येत आहे.
तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर न्यायालयाने मयत भगिरताबाई व लक्ष्मण वैरागडेच्या पाच वरसदाराच्या बाजूने निकाल देऊन तात्काळ त्या दोन एकर जागेवर कब्जा करण्यासाठी आदेश पारित केला व न्यायालयीन कर्मचाऱ्याच्या देखरेखेखाली व पोलीस बंदोबस्तात आज सकाळपासून त्या जागेची मोजणी सुरू होती. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पाच वारसदारांना जागेचा कब्जा देण्यात आला.आजच्या बाजारभवानुसार या जमिनीची किंमत अंदाजे २०० ते ३०० करोड असल्याचे समजते. या निकालामुळे शहरालगत परस्पर जमिनीचे तुकडे पाडून खरेदी विक्री व्यवहार करणाऱ्या कथित महाभागांना चांगलीच चपराक बसली आहे.