दिपक साबने,जिवती
पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील वणी खुर्द या गावात घडली.भानामती केल्याच्या संशयातुन वणी खुर्द येथील दलित कुटुंबाला गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली आहे. कोणताही पुरावा नसताना अंधश्रद्धेला बळी पडून गावातील अनेकांनी एकत्र येत क्रूरतेचा कळस गाठला. आरोपींनी भरचौकात दलीत कुटुंबातील लहान मुलासह म्हाताऱ्यांना बेदम मारहाण केली त्यात सात जण जखमी असून त्यापैकी पाच जनाची प्रकृती गंभीर आहे. संबंधित पाच गंभीर जखमींना चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १२ किमी वर अंतरावर असलेल्या वणी खुर्द या गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून संपूर्ण गावकऱ्यांनी मिळून दलित समाजातील एका कुटुंबातील सदस्यांना भरचौकात त्यांचे हातपाय बांधून जबर मारहाण केली. सदर घटना शनिवारी उघडकीस आली. याबाबत १३ जनावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. मात्र कुणावर केले, हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. गावाच्याबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्तही आहे. कुणालाही गावात येऊ दिले जात नाही आहे. संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी ही घटना घडली.
शहर विकसित होत असले तरी गावखेड्यातून अजूनही अंधश्रद्धा गेलेली नाही. केवळ अंधश्रध्देला बळी जाऊन गावकऱ्यांनी मिळून दलित समाजातील लोकांना मारहाण करणे अतिशय क्रूर असल्याचे आता बोलले जात आहे. विशेष म्हणजे, वृद्ध, महिला, लहान बाळ कोणाचाही विचार न करता बेदम मारहाण करण्यात आली आहे. एवढा सगळा प्रकार होत असतानाही पोलीस प्रशासन झोपले होते काय? असा प्रश्न आता पुढे येत आहे. मारहाण झालेल्या कुटुंबातील इतर सदस्यांना गाव सोडावे लागले आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष ही घटना घडताना काय करीत होते, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
दलित समाजातील कुटुंबातील सदस्यांना मारहाण होत असताना भीतीने या प्रकरणात गावातील कोणीही पडले नाही. घटना उघडकीस आली तेव्हा गावात तणावाचे वातावरण पसरले होते. याबाबत अधिकची माहीती देताना जिवती पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक संतोष अंबिके यांनी सांगितले की, वणी खुर्द येथील एका दलित कुटुंबावर जादू टोना केल्याचा संशय होता यातून गावातील दलीत कुटुंबियांनीच जादू टोना केल्याचा संशय असलेल्या दलित कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली. आतापर्यंत १३ जनावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या गावात वातावरण शांत आहे. पुढील तपास संतोष अंबिके यांच्या नेतृत्वात सुरू आहे.
“वणी खुर्द या गावात एका कुटुंबावर जादू टोना केल्याचा संशय होता.यातून त्यांना मारहाण करण्यात आली.पोलिसांनी जाऊन त्यांना सोडविले याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत पुढील तपास सुरू आहे” – *सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी,गडचांदूर*
*”शनिवारी घटना उघडकीस आल्यानंतर लगेच गावात शांतता बैठक घेण्यात आली.कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष दिल्या जात आहे.१३ जनावर गुन्हे दाखल करण्यात आले”*- *संतोष अंबिके, सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन,जिवती*