महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा १० वी चा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत अनेकजण यशस्वी झालेत. निकाल लागल्या बरोबर अनेकांनी आपल्या ओळखीच्या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करण्यासाठी त्यांचे फोटो, मार्कशीट स्टेटस मध्ये ठेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. सर्वप्रथम यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन….
आता उद्यापासून दोन-चार दिवस यशस्वी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांचे फोटो विविध वृत्तपत्रात छापून येतील. पण त्याच वृत्तपत्राच्या एखाद्या कोपऱ्यात हि बातमी सुद्धा नक्की दिसेल की, ‘नापास झाल्यामुळे विद्यार्थ्यांची आत्महत्या…’ हि बातमी दिसू नये म्हणूनच हि पोस्ट लिहत आहे…
मित्रांनो दहावीचा निकाल हे तुमच्यातील शैक्षणिक बदलासाठी अत्यंत महत्वाचं असलं तरीही यातून तुमचं भविष्य ठरत नाही हे मात्र नक्की..कारण आज ज्यांचा राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात पहिला क्रमांक आला आहे त्या विद्यार्थ्यांची कोणी गॅरेंटी देऊ शकत नाही की हा विद्यार्थी/ हि विद्यार्थिनी जीवनात यशस्वी होणारच म्हणून..कारण शाळेच्या परीक्षा पास होतांना अभ्यासक्रम हा मर्यादित असतो पण जीवनाच्या परीक्षा पास होतांना अभ्यासक्रमाला सीमा नसतात…
खरंतर अपयश हि यशाची पहिली पायरी आहे असे म्हणतात. मात्र अपयशी होण्यासारखे दुसरे दुःखही नाही. पण या दुःखावर मात करून जो यशाचे शिखर गाठतो तो नक्कीच जीवनाच्या परीक्षेत पास होतो. मित्रांनो कोणत्याही परीक्षेचा निकाल म्हणजे काही आयुष्य नसते तर फक्त एक कागद असते. त्यामुळे एका कागदासाठी अख्य आयुष्य संपवू नका. कारण आयुष्य तेच माणसं संपवितात ज्यांच्यात लढण्याची ताकद नसते…
छिछोरे चित्रपटात एक सुंदर डायलाग आहे. “हम हार-जित, सक्सेस-फेल्युअर में इतना उलझ गये हैं की जिंदगी जिना भूल गये जिंदगी में अगर कुछ सबसे ज्यादा इम्पॉर्टंट हैं तो वो हैं खुद जिंदगी…” म्हणून मित्रांनो आयुष्याला नाही तर मनातील भीतीला संपवा….
शालेय जीवनात ज्या सचिन तेंडुलकरने १० वी नंतर शिक्षण सोडले त्याच सचिनचा आज १० वी च्या इंग्रजीच्या पुस्तकात पहिलाच पाठ आहे. हे सर्व शक्य झाले त्याच्या मेहनतीने, त्याच्या कर्तुत्वाने…मुकेश अंबानी हे त्यांच्या MBA च्या अभ्यासक्रमामध्ये नापास झाले होते, तरीही आज ते आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत….
भारताची स्टार महिला बॉक्सर मेरी कॉम ने आपले शिक्षण शाळेत असतानाच सोडले होते, त्यानंतर तिने भारताची अव्वल बॉक्सर बनून बॉक्सिंग मध्ये आपले करियर नावरूपाला आणले..दहावी इंग्रजी विषयात नापास झालेला मनमाडचा राहुल एलींजे आज डेन्मार्क च्या विद्यापीठात विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयांचे शिक्षण देत आहे…
काही दिवसांपूर्वी राज्यसेवा PSI चा निकाल लागला होता.पेपर वाचताना एका psi ची यथोगाथा वाचत होतो. ते PSI बारावी मध्ये चक्क पाच वेळा नापास झाले होते…काश्मीर मध्ये वरिष्ठ पोलीस अधीक्षक असणारे IPS राजीव पांडे सर बारावी मध्ये तीन वेळा नापास झाले. बारावीमध्ये तीन वेळा नापास पासून थेट वरिष्ठ पोलीस अधीक्षक.. हा प्रवास खरंच प्रेरणादायी वाटतो…असे कितीतरी उदा.देतात येतील
मित्रांनो “होऊ शकत है” फक्त एका अपयशाने खचून जाऊ नका,जीवनात अश्या कित्येक परीक्षा येतील आणि जातील पण मनात उत्तुंग भरारी घेण्याची ताकद असेल तर जीवनात येणाऱ्या अश्या कित्येक परीक्षेत तुम्ही सहज यशस्वी होऊ शकता…शेवटी एकच लक्ष्यात ठेवा,
जास्त मार्क आले म्हणून माजू नका
कमी मार्क पडले म्हणून लाजू नका
जीवन जगणे सुद्धा एक परीक्षा आहे
फक्त एका अपयशाने खचून जाऊ नका..!”
-सुरज पी. दहागावकर.
चंद्रपूर.
मो.न.8698615848
(आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा)