नागेश इटेकर
गोंडपीपरी, तालुका प्रतिनिधी
गोंडपीपरी : कुळेसावली ते तोहोगाव- लाठी मार्गावरील पाचगाव जवळील भलभली नाल्यावर नविन पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे बाजूने पोच मार्ग काढून तात्पुरते वळण रस्ता निर्माण करण्यात आला. परंतु पावसाळ्यामध्ये नाल्यातील पाण्याचा वेग तीव्र होऊ शकतो अश्या अंदाजानुसार कच्चा पूलाचे बांधकाम केला नसल्याने पहिल्याच पावसात पूल वाहून गेला.
अंदाजपत्रकात तरतुद असून देखील सदर कच्चा रस्त्याचे बांधकाम करीत असताना मुरूम, गिट्टी सुद्धा टाकण्यात आले नाही. त्यामुळे पहिल्याच पाण्याच्या प्रवाहाने भलभली नाल्यावरील पुल पूर्णतः वाहून गेल्याने कुडेसावली ते तोहोगाव- लाठी मार्ग बंद झाला आहे.
सद्या शेतीची कामे जोमात सुरू आहे.शेतकऱ्यांना शेतीविषयक साधनांच्या खरेदी विक्रीसाठी कोठारी,बल्लारशाह,गोंडपीपरी अश्या मोठ्या बाजारपेठेच्या ठिकाणी येणे जाणे आवश्यकतेचे होते.परंतु संभंधित पुल पूर्णतः वाहून गेल्याने या मार्गावरील वामणपल्ली,लाठी,सरांडी, वेजगाव,आर्वी,तोहोगाव,पाचगाव,भलभली,परसोडी,कुळेसावली इत्यादी गावातील लोकांना रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे.
या पोच मार्ग व पुलाच्या निकृष्ट बांधकामाबाबत अनेक वृत्त पत्रातून बातमी प्रकाशित करून लक्ष वेधले होते परंतु संबधित विभागाचे अभियंता व कंत्राटद्गार यांच्या हेतू परस्पर दुर्लक्षमुळे आणि बेजबाबदार पणामुळे कच्चा पूल वाहून गेला त्यामुळे या मार्गातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर प्रकरनाची रितसर चौकशी करून कर्तव्यावर कसूर करणाऱ्या बेजबाबदार अभियंता व कंत्राटदारावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी जनतेकडून मागणी होत आहे.