गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे ) भं तळोधी येथील काही वॉर्डात नळाद्वारे दूषित ,अळ्यामिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे ,अनेक वर्षापासून नाल्यांची सफाई झालेली नाही .यामुळे नागरिकांच्या आरोग्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची तक्रार पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
ग्रामपंचायत सदस्य सहदेव रेड्डी ,माजी सरपंच विठोबा बावणे यांनी माध्यम प्रतिनिधींशी यासंदर्भात वार्तालाप करताना सांगितले ,भं तळोधी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आहे .ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे सध्या नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
वॉर्ड क्र चार मध्ये ग्रामपंचायतच्या नळाद्वारे अत्यंत दूषित ,अळ्यामिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे.गत वर्षापासूनची ही समस्या आहे .माजी सरपंच विठोबा बावणे यांनी तेव्हा सदर समस्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यावरही काहीच उपाययोजना करण्यात आली नाही.
काही वॉर्डातील नाल्यांची सफाई सुमारे पाच वर्षापासून झाली नाही. त्यामुळे नाल्यातील सांडपाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे !
दिनकरराव आईंचवार यांच्या दुकानापासून ते सरकारी दवाखान्यापर्यंत च्या रस्त्यावर सांडपाणी येते.समस्याग्रस्त वॉर्ड विद्यमान उपसरपंच यांचा आहे .तथापि त्यांचे याकडे लक्ष नसल्याचे सांगण्यात आले.वॉर्ड क्र 4च्या समस्या नागरिकांनी वॉर्ड क्र 5च्या सदस्याकडे मांडल्या आणि हे जागृत सदस्य समस्या माध्यमाकडे मांडत आहेत.
‘जल ही जीवन है ‘ही वस्तुस्थिती असताना भं तळोधीत अत्यंत दूषित,अळ्यामिश्रित पाणी पुरवठा होत आहे ,पाच ,पाच वर्षापासून नाल्यांची सफाई नाही ,सांडपाणी रस्त्यावर येत आहे ..यामुळे नागरिकांच्या आरोग्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शासनाकडून भं तळोधी ग्रामपंचायतला गत वर्षी 20लाखाचा पुरस्कार प्राप्त झाला.’अस्वच्छतेसाठीचा’ हा पुरस्कार होता का ?असा उपरोधिक सवाल यावेळी व्यक्त करण्यात आला .
सदर वार्तालाप प्रसंगी माजी सरपंच विठोबा बावणे ,ग्रा पं सदस्य सहदेव रेड्डी ,तालुका भाजप अध्यक्ष बबन निकोडे ,सुदर्शन बावणे ,सुभाष भस्की ,खुशाल ताजने हजर होते.