चंद्रपुर-कमी झालेले कोरोना रुग्ण आता नव्यानं वाढू लागल्याचं चित्र राज्यात अनेक ठिकाणी दिसू लागल्याने चंद्रपूर पोलिसांनी निर्ढावलेल्या लोकांचे कासरे आवरायला आजपासून सुरुवात केली. गांधी चौकात एक मोहीम राबवत मास्क न घातलेल्या लोकांना दंड करण्याची ही मोहीम राबविण्यात आली. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर लोकांमध्ये बिनधास्तपणा आला होता. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्याही काळजीचा विसर त्यांना पडला होता. जणू काही कोरोना पूर्णपणे गेला, या अविर्भावात नागरिक सर्वत्र वावरू लागले होते. अशातच चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं कमी झाली होती.त्यामुळं बहुसंख्य लोक मास्कचा वापर न करताच बाहेर फिरू लागले आहे.
मात्र आता पुन्हा एकदा या आजारानं डोकं वर काढायला सुरुवात केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शहर पोलिसांनी आज गांधी चौकात मास्क न घातलेल्या लोकांवर कारवाईला सुरुवात केली. मास्क न घातल्यास दोनशे रुपये दंड केला जात आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा आणि करवाईपासूनही बचाव करावा, असे आवाहन पोलिसांनी केले.