प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट
रेगडी येथून जवळच असलेल्या मुलचेरा तालुक्यातील
गरंजी गावातील विकासकामे गेल्या काही महिन्यांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहेत. रस्ते, नाल्या, पिण्याचे पाणी व पूल अशा महत्त्वाच्या सुविधा रखडल्या असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः गावाजवळील फुटलेल्या पुलामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. हा पूल अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, गेल्या काही दिवसांत या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत.
दररोज शेतकरी, विद्यार्थी व कामगार या पुलावरून प्रवास करतात. मात्र, पुलाच्या तडा गेलेल्या भागातून वाहने घसरून खाली जाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही काहीच हालचाल होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे.
ग्रामसभेत नुकताच या विषयावर तातडीचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये एकमुखाने प्रशासनाला चालू वर्षातच काम करण्याचे अवधी देण्यात आला असून, या काळात पूल दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास गरंजी गावातील सर्व नागरिक रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
स्थानिक युवक मंडळ, महिला बचत गट आणि ग्रामपंचायत सदस्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन पूल दुरुस्त करावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.







