ब्युरोचीफ प्रशांत शाहा
मुंबई: संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा हाहाकार वाढतच आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात शहरी भागात कोरोना आटोक्यात येत असताना, आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. हा कोरोनाचा पादुर्भाव राज्यातील 15 जिल्ह्यात दिसून येत आहे.
महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांसोबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख उपस्थित होते. अडीच तास बैठक झाली असून या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला.
त्यावेळी 15 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि पोलीस महासंचालकांना बारकाईने सर्वेक्षण करण्यास सूचना दिली गेली आहे. तसेच जे बाधित असतील, ज्यांना लक्षणे असतील त्यांना होमक्वारंटाईन न करता विलगीकरण करा. होमक्वारंटाईनबाबत समाधानी नसल्याचे यावेळी स्पष्ट केले. या 15 जिल्ह्यामध्ये अमरावती, बुलडाणा, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, सोलापूर, सातारा, अहमदनगर, उस्मानाबाद, अकोला, वाशिम, बीड, गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे.
त्यामुळे येथे कडक लॉकडाऊनचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. दरम्यान, येथे कोरोनाची लक्षणे असलेल्यांना होमक्वारंटाईन न करता विलगीकरण करा, अशा सूचना सरकारने केल्या आहेत.
राज्यातील 15 जिल्ह्यात लॉकडाऊन, कडक निर्बंध असूनही रुग्णसंख्येचा आकडा कमी होत नाही आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जो कोरोनाबाधितांचा पॉझिटिव्ह आकडा आला होता, त्यापेक्षा जास्त आजही या आठवड्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी 15 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांसोबत चर्चा करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली.
कडक निर्बंध असून रुग्णसंख्येत वाढ का होत आहे? त्याची कारणे तपासा. त्याच्याप्रमाणे दुरुस्ती झाली पाहिजे. त्यादृष्टीने त्यांना सूचना द्याव्यात आणि मार्गदर्शन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.