माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेसाठी तयारी सुरू

1055

 

जिल्हास्तरावरील प्रशिक्षण पुर्ण तर ३३५ पथके करणार सर्वेक्षण

गडचीरोली प्रतिनिधी/सतीश कुसराम

कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच त्यामूळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून जिल्हास्तरावर विविध कामांना सुरूवात झाली आहे. यात आज जिल्हास्तरावर व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे तालुका वैद्यकिय अधिकारी, वैद्यकिय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र व समुदाय आरोग्य अधिकारी यांचे प्रशिक्षण पुर्ण झाले. यामध्ये १२ तालुका आरोग्य अधिकारी, ९० प्रा.आरोग्य वैद्यकिय अधिकारी व ४८ समुदाय आरोग्य अधिकारी यांचा समावेश होता. आता पुढिल दोन दिवसात गावस्तरावरील पथक सदस्यांना हे प्रशिक्षण देणार आहेत. जिल्हयातील ११३०३७६ लोकसंख्येमधील २६९७१७ कुटुंबांसाठी १५ दिवस गृहभेटीसाठी ५३९४ पथके म्हणजेच ३३५ पथकांची गरज भासणार आहे.

पथकामध्ये एक कर्मचारी किंवा आशा असणार आहे. जोडीला दोन स्थानिक स्वयंसेवक यामध्ये एक स्त्री व एक पुरूष राहणार आहे. असे ३ जणांचे पथक घरोघरी जावून कोविड १९ बाबत सर्वेक्षण व जणजागृती करणार आहे. या पथकातील प्रत्येकाला कोरोना दूत म्हणून संबोधले जाणार आहे. गावातील तसेच शहरातील स्थानिक दोन स्वयंसेवकांची निवड संबंधित सरपंच तसेच नगरसेवक करणार आहेत. जर स्थानिक स्वयंसेवक उपलब्ध झाले नाहीत तर पुन्हा आरोग्य कर्मचारी तसेच आशाचा समावेश केला जाणार आहे. कुटुंबभेटीसाठी आवश्यक साहित्य यामध्ये थर्मामीटर, स्टीकर, स्टिकर, मार्कर पेन, टीशर्ट, टोपी, बॅच, मास्क, सॅनिटायझर व लिखाण साहित्य पुरविण्यात येणार आहे.

*जिल्हाधिकाऱ्यांचे जिल्हयातील पदाधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे आवाहन*

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत सरपंच, नगराध्यक्ष यांना मोहिमेत सहभाग होणेसाठी लेखी पत्रांद्वारे आवाहन केले आहे. यामध्ये सर्व ग्रामपंचायती व सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतींना आवाहन पत्र पाठविण्यात आले आहे. यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व स्तरावर प्रत्येक घटकाची गरज असून आपणासह सर्व सहकारी यांना या संसर्ग रोखण्यासाठी जीवीतहानी होवू न देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*नागरिकांनी पथकाला खरी माहिती देण्याची व सहकार्य करण्याची गरज : कुमार आशिर्वाद*

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांनी नागरिकांनी या मोहिमेत पथकाला खरी माहिती देवून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी तसेच कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी ही मोहिम राबहवली जात आहे. याकरीता प्रत्येक कुटुंबाचे सहकार्य असणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. आपल्यासाठी आपल्या कुटुंबांच्या संरक्षणासाठी हे पथक हे कोरोना योध्दे घराघरात जात आहेत. या मोहिमेतून आजारी लोकांना उपचार दिले जाणार आहेत तर जोखमीचे पुर्वीचा आजार असलेल्यांना आवश्यक खबरदारीचा सल्लाही दिला जाणार आहे.

*तीन प्रकारच्या व्यक्तिंना महत्व* : माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेतून प्रत्येकाला आपल्या जबाबदाऱ्या लक्षात आणू देणे हे उद्दीष्ट असणार आहे. यामध्ये कोरोना बाधित नसलेली व्यक्ती, बाधित असलेली व्यक्ती व कोरोना बाधा होवून गेलेली व्यक्ती अशा तीन वेगवेगळया लोकांसाठी संदेश वहन केले जाणार आहे. आपण नेमकी कशी काळजी घ्यावी, काय करावे आणि काय करू नये याबाबत कोरोना दूत माहिती देणार आहेत. कोरोना संसर्ग होवू न देणे यासाठी काय काय करावे याबाबत सविस्तर तपशिल यात दिला जाणार आहे. तर कोरोना बाधिताला घरीच विलगीकरणात ठेवले असल्यास त्यासाठी आवश्यक सूचनाही यावेळी सांगितल्या जाणार आहेत. तसेच ज्यांना कोरोना संसर्ग होवून गेला आहे. त्यांनी नंतर १० ते ७ दिवस विलगीकरणात काय काय खबरदारी घ्यावी याबाबत हे पथक घरोघरी जावून जनजागृती करणार आहे.