परिसरातील नागरिक भयभीत
दिपक साबने-जिवती
जिवती तालुका घनदाट जंगल आणि डोंगरदऱ्या नी नटलेला आहे. घनदाट जंगल आणि डोंगरदऱ्यात व शेतशिवारात मागील काही दिवसांपासून वाघाचा मुक्काम होता. आता मात्र वाघ गावशिवारात आढळून येत आहे. डोंगरदऱ्या व घनदाट जंगलाने व्याप्त असलेला जिवती तालुक्याचा भूभाग वन्यजीवांच्या आवासासाठी उपयुक्त आहे.
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघ – मानव संघर्षाने टोक गाठले आहे. वाघाच्या हल्ल्यात ठार होण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशात जिवती वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या गावालगतच्या जंगलात वाघ दिसल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. केकेझरी येथील गावालगत च्या जंगलात पट्टेदार वाघाने एका गोऱ्याला मारल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. सकाळी ०६:०० ते ०७:०० च्या दरम्यान दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने बौलावर झडप टाकली या हल्ल्यात बैल जागीच मृत्यू झाला. बैल माधव भोगे या शेतकऱ्यांचा आहे.ऐन खरिप हंगामात एका बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. वनविभागाकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली वनाविभागाची चमू शेतात दाखल झाली. वाघाच्या पगमार्क चे निरीक्षण करून पगमार्क च्या दिशेने जंगलात गेले असता वाघाने एका रानडुकराला ही फस्त केल्याचे आढळून आले आहे.पंचनामा एम.आर. वंदिले,वनरक्षक यांनी केला.
सदर वाघ शेतातून जंगलाच्या दिशेने गेल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या गावालगत वन लागून आहे आणि नतंर खेडे गाव आहेत. या आधी कधी वाघाचे दर्शन झाले नव्हते मात्र आता वाघाचे वास्तव्य असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागा मार्फत जंगलात कॅमेरे लावण्यात आले आहेत तसेच वनविभागाने आपली गस्त ही वाढवली आहे. सोबतच नागरिकांनी रात्रौ ९ च्या नंतर व सकाळी ५ वाजेपर्यंत सदर परिसरात किंवा शेतात, जंगलात जाऊ नये व सावध राहावे असे वनविभागा मार्फत सांगण्यात आले आहे.
” पट्टेदार वाघाच्या दर्शनाने व वाघाने बैल ठार केलेल्या घटनेने शेतकऱ्यासह मजुरवर्ग शेतकामावर जाण्यास घाबरत आहे.शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी व त्वरित वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा”
” पंढरी गायकवाड,पोलीस पाटील,केकेझरी”