चार महिन्यांपासून पडलेला वीज खांब धोकादायक; महावितरणाच्या दुर्लक्षामुळे जीवितास धोका
प्रतिनिधी रेगडी:
रेगडी येथील मुख्य रस्त्यालगत मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी एका अज्ञात वाहनाच्या धडकेत वीज खांब कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती तात्काळ महावितरण विभागाला देण्यात आली होती. मात्र, इतका कालावधी उलटूनही संबंधित वीज खांबाची दुरुस्ती किंवा नवीन खांब उभारण्याची कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
सध्या हा वीज खांब रस्त्यालगत धोकादायक अवस्थेत पडून असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः येत्या पावसाळ्यात जोरदार वारे व पावसामुळे हा खांब अथवा वीज तारा आणखी धोकादायक ठरू शकतात. या मार्गावरून दररोज वाहनचालक, पादचारी तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा महावितरण विभागाकडे याबाबत पाठपुरावा केला असला तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. एखादी जीवितहानी झाल्यानंतर प्रशासन जागे होण्यापेक्षा, तत्काळ नवीन वीज खांब उभारून परिसरातील संभाव्य धोका दूर करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
Home Breaking News चार महिन्यांपासून पडलेला वीज खांब धोकादायक; महावितरणाच्या दुर्लक्षामुळे जीवितास धोका







