छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये इंग्रजांना झुकवण्याची ताकद होती म्हणून इंग्रज शिवाजी महाराजांच्या पुढे झुकुन मुजरा करायचे. शिवरायांनी स्वराज्य निर्माण केला नसता तर जुलमी राजवटींनी इथल्या माणसांचे हाल केले असते. स्वराज्यात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता देखील आनंदी राहतं होती. छत्रपती शिवराय हे आदर्श लोकराजे होते असे प्रतिपादन राज्याचे विरोधीपक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांनी केले.
ब्रम्हपूरी तालुक्यातील मालडोंगरी येथे शिवबा गृपच्या वतीने अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. या अनावरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रामुख्याने माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जिल्हा परिषद सदस्या स्मिताताई पारधी, राजीव गांधी पंचायतराज संघटनचे प्रदेश महासचिव थानेश्वर कायरकर, गडचिरोली काॅंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष हसन गिलानी, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, सरपंच मंजषा ठाकरे, माजी सरपंच राजेश पारधी, उपसरपंच विनोद घोरमोडे, सुप्रसिद्ध नाट्य कलावंत हिरालाल सहारे, कंत्राटदार गणेश घोरमोडे, ग्रा.पं.सदस्य नितीन चौधरी यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित अभ्यासक्रम शिकवल्या जातो. शिवरायांचे सैन्य जेव्हा लढाईवर निघायचे तेव्हा शिवराय सैन्यांना आदेश द्यायचे की, शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठाच सुध्दा कुठलंही नुकसान व्हायला नको. छत्रपती शिवराय हे एकमेव राजे होते ज्यांच्या दरबारात कधीच स्त्री नाचली नाही. कारण परस्त्रीला मातेचा दर्जा देणारे ते होते. ३५० वर्षांनंतरही मोठ्या आदराने छत्रपतींचे नाव घेतल्या जाते. त्यांच्या शौर्याचा इतिहास हा अविस्मरणीय आहे. कारण ते स्वतः एक प्रेरणा आहेत. अशा या जनकल्याणासाठी राजाचे पुतळे उभारण्यासाठी मी कधीच कमी पडणार नाही असेही यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
मालडोंगरीत जल्लोष
गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण असल्याने गावभरात मोठा जल्लोष बघायला मिळाला. कार्यक्रमापूर्वी लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात गावातुन मिरवणूक काढण्यात आली. विविध प्रकारची वेशभूषा केलेली मूले हे यावेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. अनावरण सोहळ्याप्रसंगी आकर्षक रोषणाईने गाव उजळुन निघाले होते. संपूर्ण गाव शिवमय वातावरणात दंग झाले होते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी झाकी सादरीकरणाच्या माध्यमातून शिवरायांच्या आदर्श व प्रेरणदायी जीवनचरित्रावर प्रकाश टाकला.