महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्याच लागणार असल्याची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. न्यायालयाचा निकाल कधी येणार यावरुन चर्चा सुरु होती. आता महाराष्ट्राच्या प्रकरणातील निकाल उद्या समोर येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ उद्या शिवसेना खटल्याचा निकाल देणार आहे, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची जाहीर केले आहे. सरन्यायाधीश म्हणाले की, उद्या दोन घटनापीठाचे निकाल आहेत. मागील नऊ महिन्यांपासून महाराष्ट्रातील सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरु होती. त्याचा निकाल जाहीर होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयासमोर १६ आमदारांना अपात्रते संदर्भात याचिका आहे. तसचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले होते. त्यासंदर्भातही न्यायालय निकाल देणार आहे. तसचे व्हिप कुणाचा ग्राह्य घरला जाणार आहे, त्यावरही न्यायालय निर्णय देणार आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी १६ मार्चला संपली होती. या सुनावणीवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. ही सत्तासंघर्षाची सुनावणी तब्बल १२ दिवस ४८ तास चालली होती. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वतीने जोरदार युक्तीवाद करण्यात आले होते. न्यायालयासमोर या प्रकरणातील अनेक याचिका आहेत. यातील मुख्य याचिका म्हणजे, १६ आमदारांची आणि दुसरी राज्यपालांचा निर्णय अशा अनेक याचिका आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड करत गुवाहाटी गाठले आणि तेथून महाराष्ट्रात परत येत सरकार स्थापन केले. दरम्यानच्या काळात बऱ्याच घडामोडी घडल्या. बंडानंतर शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर शिंदेंनीही याचिका दाखल केली होती.
सुरुवातीला सरन्यायाधीश व्ही. एन रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली न्या. कृष्ण मुरारी आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे ११ जुलै २०२२ पासून सुनावणी झाली. याच खंडपीठाने हे प्रकरण पाच सदस्यांच्या घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. विद्यमान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली हिमा कोहली, न्या. एम आर शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. पी नरसिंहा या पाच सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्यात आले होते.
या घटनापीठाच्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने सुनावणीला सुरुवात झाली होती. ता. १४ फेब्रुवारीपासून दोन्ही बाजूकडून युक्तीवाद करण्यास सुरूवात झाली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद १२ दिवस, ४८ तास झाला. यातील पहिले ३ दिवस प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या पीठाकडे द्यायचे की नाही यावर युक्तिवाद करण्यात आला. मात्र, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी शिवसेनेची ही मागणी फेटाळून लावत पाच सदस्यीय खंडपीठापुढेच सुनावणी सुरू राहील, असे स्पष्ट केले होते. आता गुरुवारी या प्रकरणाचा निकाल येणार आहे.