Homeचंद्रपूरजिवतीतीन दशकापासून तिथे उंच पुलाची प्रतीक्षाच "त्या" गावाचा सम्पर्क अजूनही तुटलेलाच...

तीन दशकापासून तिथे उंच पुलाची प्रतीक्षाच “त्या” गावाचा सम्पर्क अजूनही तुटलेलाच : स्वातंत्र्यानंतरही मराठगुडा वनवासात

बळीराम काळे,जिवती

जिवती (तालुका प्रतिनिधी) : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठया थाटामाटात साजरा होत आहे मात्र शेडवाही (लांबोरी) ग्राम पंचायत अंतर्गत मराठगुडा वासियांना आजही रस्ता व पुलियासाठी तीन दशकांपासून वाट पाहावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रस्त्याचा विकास तर गावाचा विकास असे समीकरण आहे. शेडवाही (लांबोरी) वरून शंभर मीटर अंतरावर असलेला पूल पावसाळ्यात वाहून गेला तेंव्हापासून आजपर्यंत मराठगुडा या गावाचा सम्पर्क तुटला आहे.
तालुक्यातील शेडवाही (लांबोरी) ग्राम पंचायत अंतर्गत शेडवाही ते मराठगुडा या गावादरम्यान मोठा नाला आहे. या नाल्यावर जवळपास ३० वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले. सदर पूल कमी उंचीचा असल्यामुळे पावसाळ्यात नेहमीच पुलावरून पाणी वाहत असते. यावर्षी पावसाळ्यात तर पुलाचे सर्व पाईप उघडे पडले आहे. परिणामी वाहतूक ठप्प होऊन मराठगुडा गावाचा संपर्कच तुटला आहे. नाईलाजाने गावातील नागरिकाना त्याच उघड्या पुलावरून ये जा करावी लागते.
गावाला जोडण्यासाठी सदर मार्ग एकमेव असल्याने त्यावरून नागरिकांची वर्दळ असते. सदर पुलाची उंची पाच ते सहा फूटच आहे. पावसाळ्यात दरवर्षी कमी उंचीचा पूल असल्याने पुलावरून पाणी वाहत असते. या वर्षी तर पूर्ण पाईपच उघडे पडले. मराठागुडा या गावातील मजूर, शेतकरी यांना याच मार्गाने शेतीकामासाठी शेडवाही (लांबोरी), गुडशेला इत्यादी गावात जावे लागते. सदर पुलावरून ये जा करताना दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत आहे.
पावसाळ्यापासून आजपर्यंत गाववसीयांचा रस्ता दुचाकी आणि चारचाकी साठी तसेच बैलबंडी साठीसुद्धा कायमचाच बंद असल्याने मराठगुडा गावातील गावकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आम्ही भारतात जन्माला येऊन पाप केले काय ? आम्हाला न्याय कधी मिळणार असा प्रश्न संतप्त गावाकऱ्यांनी उपस्थित केला आहे. पुलामुळे गावात रुग्णवाहिकाही जाऊ शकत नसल्याने गावातील महिलांची प्रसूती ही गावातच करावी लागते. तसेच गावातील गंभीर आजाराच्या रुग्णांना वेळेवर उपचाराकरिता शक्य होत नाही. याचा त्रास विद्यार्थी, वयोवृध्द, महिला या सर्वांना होत आहे. या समस्येकडे सबंधित विभागाने जातीने लक्ष घालण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!