चक्रधर मेश्राम सहसंपादक
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि गैर आदिवासी गावांतील जे विद्यार्थी, विद्यार्थीनी बाहेर गावी उच्च शिक्षणासाठी, प्रशिक्षणासाठी गेलेले आहेत त्यांना सुरजागड पारंपरिक इलाका गोटूल समिती आणि जिल्हा महाग्रामसभा स्वायत्त परिषदेच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येते की, आपल्या पूर्वजांनी रक्षण आणि जतन करून ठेवलेली जल जंगल जमीन आणि संसाधने आज 25 बेकायदा लोह खदानींमुळे नष्ट होवून अनुसूचित क्षेत्रातील भूमिपूत्रांना आणि येणाऱ्या पिढीला विस्थापित होण्याची वेळ आलेली आहे.
त्यामुळे आपल्या जिल्हाभरातील आदिवासी अशिक्षित आई-वडीलांनी पुर्वजांची ही विरासत वाचविण्यासाठी एट्टापल्ली येथील नाक्यावर 25 ऑक्टोबर पासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलेले आहे.
आपल्या या संघर्षशिल आई – वडिलांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी गडचिरोली, नागपूर, पुणे, मुंबई यासारख्या शहरात शिक्षणासाठी, प्रशिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांनी परत येवून आंदोलनात सहभागी होवून शहिद बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके यांचा आदर्श खरा ठरवावा, असे आवाहन महाग्राम सभे तर्फे करण्यात आले आहे.