राज्यातील कॅबिनेट मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली या बैठकीमध्ये कॉलेज सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी काही नियमावली तयार करण्यात आली आहे. कॉलेज सुरु करण्यासंदर्भातील नियमावली कॉलेज सुरु करताना कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. 50% पटसंख्या उपस्थितीत कॉलेज सुरू केले जाणार आहेत. कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून कॉलेज आणि शाळा (Colleges and schools closed) संपूर्णपणे बंद होते. शाळांनंतर आता येत्या 20 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व महाविद्यालयं सुरु करण्यात येणार आहेत अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे.
लसीचे दोन डोस पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे अशा जिल्ह्यांसाठी वेगळी नियमावली असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं संपूर्ण लसीकरण होऊ शकलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या विद्यार्थ्याना कॉलजेमध्ये येणं शक्य होत असेल अशा विद्यार्थ्यांसाठी कॉलेजकडून विशेष शिक्षणाची व्यवस्था करण्यात यावी. कोरोनाची नियमावली पाळून वसतिगृह सुरु करण्यात येतील. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचं संपूर्ण लसीकरण होणं महत्त्वाचं आहे. राज्यातील सर्व महाविद्यालयांनी कोरोनाचे सर्व नियम पाळूनच महाविद्यालयं सुरु करायची आहेत. लोकल सुरु होणार का? मुंबईतील कॉलेजेस सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाण्यासाठी लोकलची गरज असणार आहे. अशा परिस्थिती कॉलेज सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी लोकलची सेवा सुरु करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निवदेन सादर केलं जाणार आहे अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.