नागेश इटेकर
गोंडपीपरी, तालुका प्रतिनिधी
गोंडपीपरी : महाराष्ट्र-तेलंगाणा राज्याला जोडणाऱ्या मार्गाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.त्या दरम्यान सकमुर जवळील नाल्यावर नविन पुलाचे बांधकाम सुरू आहे.नागरिकांच्या रहदारीस अडथळा येऊ नये म्हणून बाजूने पोच मार्ग काढून तात्पुरते वळण रस्ता निर्माण करण्यात आला आहे. परंतु पावसाळ्यामध्ये नाल्यातील पाण्याचा वेग तीव्र होऊ शकतो अश्या अंदाजानुसार कच्चा पूलाचे बांधकाम केला नसल्याने पहिल्याच पावसात पूल वाहून गेला.
अंदाजपत्रकात तरतुद असून देखील सदर कच्चा रस्त्याचे बांधकाम करीत असताना मुरूम, गिट्टी सुद्धा टाकण्यात आले नाही. त्यामुळे पहिल्याच पाण्याच्या प्रवाहाने सकमुर नाल्यावरील पुल पूर्णतः वाहून गेल्याने महाराष्ट्र-तेलंगाणा राज्याला जोडणारा मार्ग बंद झाला आहे.सादर मार्गाचे बांधकाम अतिशय कासव गतीने होत असल्याने मार्गातील पूला व्यतिरिक्त कोणतीच कामे पूर्णत्वास गेली नाही.त्यातच पावसाळा सुरू झाला असल्याने तात्पुरता बांधलेला मार्ग हा चीखलमय झाल्याने वाहने चालविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सद्या शेतीची कामे जोमात सुरू आहे.शेतकऱ्यांना शेतीविषयक साधनांच्या खरेदी विक्रीसाठी गोंडपिपरी,धाबा,बल्लारपूर,चंद्रपूर अश्या मोठ्या बाजारपेठेच्या ठिकाणी येणे जाणे आवश्यकतेचे आहे.परंतु संबंधित पुल पूर्णतः वाहून गेल्याने या मार्गावरील सोनापूर,वेडगाव, पोडसा, धाबा, हिवरा, गोजोली इत्यादी गावातील लोकांना रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे.
या पोच मार्ग व पुलाच्या निकृष्ट बांधकामाबाबत अनेक वृत्त पत्रातून बातमी प्रकाशित करून लक्ष वेधले होते परंतु संबधित विभागाचे अभियंता व कंत्राटद्गार यांच्या हेतू परस्पर दुर्लक्षमुळे आणि बेजबाबदारपणामुळे कच्चा पूल वाहून गेला त्यामुळे या मार्गातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर प्रकरनाची रितसर चौकशी करून कर्तव्यावर कसूर करणाऱ्या बेजबाबदार अभियंता व कंत्राटदारावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी सकमुर येथील जनतेकडून मागणी होत आहे.