चंद्रपूर: ताडोबा व्याघ्रप्रकल्पामधील चिमूर तालुक्यात येणार्या कोलारा गेटजवळ असलेल्या देवरी (चैती) येथील वन्य विलास रिसॉर्टमधील व्यवस्थापकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. पाण्याची मोटार स्वच्छ करत असतानाही रविवारी (दि. १३) ला दुपारी ही घटना घडली. राघुदीप भवानी पांडा (वय ३५) असे मृताचे नाव आहे.
रिसार्टमधील पाण्याची टाकी स्वच्छ करण्याचे काम सुरू होते. तेथील काही कामगार तिथे उपस्थित होते. राघुदीप पांडा हे पाणी काढण्याची मोटार दुरुस्त करण्यासाठी पाण्याच्या टँकमध्ये उतरले. कर्मचाऱ्यांना स्वीच ऑन करण्यास सांगितले. स्वीच ऑन करताच त्या मोटार पंपमध्ये वीज प्रवाह आला.
त्याचा पांडा यांना जोरदार झटका लागला. ही घटना लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी मोटारपंपाचा प्रवाह बंद केला. मात्र, थ्रीफेज वीज प्रवाह असल्याने पांडा खाली कोसळले. कर्मचाऱ्यांनी त्यांना चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.