चंद्रपुर: दिनांक ५ मार्चपासुन स्थानिक बिरसा मुंडा चौक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, चंद्रपूर येथे आदिवासी बांधवांचा, जननायक बिरसा मुंडा स्मारकासाठी बैठा सत्याग्रह अखंड सुरू आहे. आज या आंदोलनास ११५ दिवस झालेत. परंतु अद्यापही प्रशासन जननायक बिरसा मुंडा स्मारकाच्या जमिन हस्तांतरणा संदर्भात फारसे गंभिर दिसत नाही.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. दि. १३.०६.२०२१ रोज रविवारला सायंकाळी ५.०० वाजता आलेल्या वादळी पावसाने आदिवासी आंदोलकांची भंबेरी उडवुन दिली.पेंडॉल मधे यावेळी एकटाच व्यक्ति असता तर तो मेल्याशिवाय राहीला नसता. अशाही परीस्थितीत आदिवासी बांधव आपल्या न्याय्य मागणीसाठी आंदोलन चालवित आहेत. पावसाळी वातावरण पाहु जाता आदिवासी आंदोलकांच्या जिवितास नक्कीच धोका उत्पन्न झाला आहे. आदिवासी आंदोलक मेल्यावरच प्रशासनाला जाग येणार काय ? असा संतप्त सवाल आदिवासी बांधव प्रशासनाला विचारत आहेत. स्मारकासाठीच्या ५४ चौ. मी. जागेच्या हस्तांतरणाचा प्रश्न जर प्रशासन निकाली काढु शकत नाही तर असे ढिम्म व ढीसाळ प्रशासन काय कामाचे ? असा संतप्त सवाल जागरचे अध्यक्ष श्री अशोक तुमराम यांनी या पत्रकाद्वारे केला आहे.
आदिवासी बांधव १४ जुनपर्यंत सकारात्मक कारवाईची प्रतिक्षा करणार आहेत. जर हे प्रकरण निकाली निघाले नाही तर मात्र १५ जुनपासुन अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय जाहीर करण्यात आला. थंडी, वारा, पाऊस, वादळ यामुळे आंदोलकांच्या जिवितास धोका निर्माण झाल्यास किंवा जिवितहानी झाल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा गर्भित इशाराच आदिवासी बांधवांनी यावेळी दिला आहे.