ठाणे | उल्हासनगर येथील जयजनता काॅलनीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये केवळ 20 रुपये दिले नाही या रागातून एकाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर संबंधित व्यक्तीच्या पत्नीने पोलिसांसमोर ज्याप्रकारे टाहो फोडला, त्याने कोणाच्याही अंगावर काटा येईल. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित मृत झालेल्या व्यक्तीचं नाव अनिल आहुजा असं आहे. शुक्रवारी रात्री अनिल आपल्या मित्रासोबत बोलत बसले असताना त्याच परिसरातील साहिल नावाच्या व्यक्तीने त्या दोघांकडे 20 रुपयांची मागणी केली. मात्र दोघांनीही त्याला 20 रुपये दिले नाहीत. यादरम्यान साहिलने त्यांना शिवीगाळ करुन बघुन घेईल अशी धमकी दिली.
या धमकीला दोघांनीही गांभीर्याने घेतलं नाही.
रविवारी रात्री अनिल घरातून बाहेर येऊन आपल्या दुसऱ्या मित्राशी बोलत असताना साहिलने तिथं येऊन 20 रुपये दिले नसल्याचा राग व्यक्त केला. यातून दोघांमध्ये वाद झाला. अशातच साहिलने त्याच्या पँटच्या खिशातील चाकू काढून अनिल यांच्यावर वार केला. यामध्ये अनिल जागीच मृत झाले.
दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन साहिलला अटक केली. तसेच अनिल यांना दोन मुलं असून आपल्या मुलांचा सांभाळ आता कोण करणार असा टाहो अनिल यांच्या पत्नीने पोलिसांसमोर फोडला.