एटापल्ली बस सुरू; आता अहेरी बसची नागरिकांची मागणी जोर धरते

प्रतिनिधी गौरव बुरांडे :
रेगडी:
मागील २४ तारखेपासून गडचिरोली–रेगडी–एटापल्ली ही बस सेवा सुरू करण्यात आली असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र आता रेगडी येथून अहेरी–मुलचेरा मार्गावरही बस सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
गट्टा, देवदा, हेटळकसा, बोलेपल्ली, पुलिगुंडम, गरंजी व वेंगनूर या गावांतील नागरिकांनी याबाबत मागणी केली आहे. चामोर्शी तालुक्यातील रेगडी हे गाव सध्या भामरागड, एटापल्ली, मुलचेरा व अहेरी या तालुका मुख्यालयांसाठी केंद्रबिंदूचे ठिकाण बनले आहे.
परिसरातील अनेक गावे वेगवेगळ्या तालुक्यांत समाविष्ट असल्यामुळे नागरिकांना आपापल्या तालुका मुख्यालयात जाण्यासाठी प्रथम रेगडी येथे यावे लागते. मात्र रेगडीहून सर्व दिशांना जाणाऱ्या मार्गांवर राज्य परिवहन महामंडळाची नियमित बस सेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे.
यामुळे प्रवास खर्च वाढत असून विद्यार्थ्यांपासून ते रुग्णांपर्यंत सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एस.टी. महामंडळाने रेगडी–अहेरी–मुलचेरा या मार्गावर लवकरात लवकर सोयीस्कर बस सेवा सुरू करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरत आहे.







