प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट : मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे घोट परिसरातील शेतकऱ्यांच्या धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकात पाणी साचून धान जमीनदोस्त झाले असून शेतातील उभे पिक पूर्णपणे आडवे पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
धान कापणीला अवघे काही दिवसच उरलेले असताना अचानक कोसळलेल्या पावसामुळे शेतात थेट पाणी साचले. पाण्याच्या तळ्यात उभे धान कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी धान पाणी व चिखलाखाली पूर्ण झाकले गेले असून त्याचे पुनरुज्जीवन शक्य नसल्याचे दिसते.

स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की,
“आम्ही वर्षभर कष्ट करून पिक उभं केलं. पण एवढ्या वेळेला आलेल्या पावसाने सर्व काही वाहून नेलं. आता खर्च तरी निघेल की नाही याचीही शंका आहे.”
या नुकसानीची तात्काळ पाहणी करून प्रभावित शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. हवामान विभागाने अजूनही पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे.
घोट येथील गौरव बुरांडे या शेतकरीचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण पिक पाण्यात गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.
शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून योग्य भरपाई मिळावी, अशी मागणी पुढे जोर धरत आहे.







