सुनील पोटे यांच्या आंबील झाडीकाव्यसंग्रहाचे प्रकाशन…साहित्यातून संवेदनशील माणूस घडावा – ना.गो. थुटे

312

राजुरा (प्रतिनिधी )

चंद्रपूर जिल्हा झाडीबोली साहित्य मंडळ ग्रामीण विभागाचे वतीने आयोजित कार्यक्रमात कवी सुनील पोटे यांच्या पहिल्या आंबील झाडीकाव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले . संत नगाजी महाराज सभागृहात आयोजित ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आचार्य ना.गो.थुटे होते . उदघाटन विजय वाकुलकर उपायुक्त समाज कल्याण यांचे हस्ते झाले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे ,ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , झाडीपट्टीचे सुप्रसिद्ध कलावंत डाॕ. परशुराम खूणे, प्रमुख भाष्यकार म्हणून कवी अरूण झगडकर , प्रशांत भंडारे आदींची उपस्थिती होती .आंबीलचे रचयिते सुनील पोटे यांनी प्रास्तविक केले.त्यात त्यांंनी काव्यसंग्रह निर्मिती बाबतच्या प्रेरणा , झाडीबोलीबाबत असलेली आस्था व ती टिकविण्याची आवश्यकता यावर प्रकाश टाकला. भाष्यकार अरूण झगडकर यांनी सुनील पोटे यांच्या आंबील ह्या काव्यसंग्रहातून घडणारे झाडीपट्टीतील समाजमनाचे अस्सल दर्शन आणि झाडीबोली शब्दांचे सौंदर्य यावर प्रकाश टाकला तर प्रशांत भंडारे यांनी आंबील मध्ये आलेले बोली शब्दभांडार यावर विश्लेषण केले. उपायुक्त विजय वाकुलकर यांनी आपल्या बोलीभाषेचे महत्व सांगून त्याकरीता प्रत्येकांनी प्रयत्न करायला हवे असे मत मांडले. लखनसिंह कटरे यांनी झाडीपट्टीतील साहित्य बोन्साय नसून नैसर्गिक असल्याचे प्रतिपादन केले. आंबीलपेय जसे माणसाला नवीउर्जा देते तसेच या काव्यसंग्रहातून झाडीप्रदेशातील लोकतत्वाचे अचूक दर्शन घडते असे प्रतिपादन बंडोपंत बोढेकर यांनी केले. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांची आपल्या जीवनातील आठवण सांगत ते ना .गो. थुटे म्हणाले , साहित्यलेखन ही कला असून त्यातून माणूस घडला गेला पाहिजे . याच कार्यक्रमात झाडीबोली साहित्य मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या वार्षिक झाडीबोली साहित्य पुरस्काराने मुर्लिधर खोटेले (झाडीकाव्य ), बन्सी कोठेवार (चित्रकला ), डाॕ.परशुराम खूणे( झाडीनाट्य सेवा ) ,लखनसिंह कटरे (वैचारिक लेखन), आनंदराव बावणे (कथालेखन) इत्यादींना सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन रामकृष्ण चनकापुरे यांनी केलै तर डाॕ.सौ.अर्चना पोटे यांनी आभार मानले .दुसऱ्या सत्रात दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि ॲड. सारिका जेनेकर यांच्या उपस्थितीत कवी संमेलन संपन्न झाले. त्यात संतोष मेश्राम,भावना खोब्रागडे,नेताजी सोयाम,लक्ष्मण खोब्रागडे,नागेंद्र नेवारे ,अर्जुमन शेख,सुनील कोवे,दुशांत निमकर,शितल कर्णेवार,अरुण घोरपडे, नेतराम इंगळकर,संगीता बांबळे, संतोष कुमार उईके, डाॕ.किशोर कवठे,प्रविण तुराणकर,माधव कौरासे,हेमा लांजेवार ,विरेनकुमार खोब्रागडे ,प्रदीप मडावी आदींनी काव्यरचनांचे सादरीकरण केले. रामकृष्ण मांडवकर, प्रा.गणेश लोहे, प्रा. श्रावण बानासुरे ,ॲड. जेनेकर , विनोद ढोबे, रामरतन चाफले,राजेंद्र कुळमेथे आदींनी सहकार्य केले. कोरोना नियमांचे पालन करून अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला.