‘बाप समजून घेण्यासाठी आधी बाप व्हावं लागतं’ हे माझ्या वडिलांचे शब्द मला वेळोवेळी वडिलांच्या कष्टाची, त्यागाची, समर्पणाची जाणीव करून देत असतात. खरंतर प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांचे स्थान नक्कीच वेगवेगळे असू शकते. परंतु ज्यावेळी एक वडील म्हणून त्यांना आपण समजून घेऊ तेव्हा वडिलांबद्दल सर्वांचे विचार सारखे असतील या दुमत नाही…
आज कितीतरी कुटुंबात ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी असे दिसून येते की घरी वडील आणि मुलांमध्ये नेहमीच शीतयुद्ध सुरू असतात. हे शीतयुद्ध कधी महायुद्धात जाते हे कळत सुद्धा नाही. त्यामुळे आज कितीतरी मुलं असे आहेत की जे आई-वडिलांच्या त्यागामुळे यशस्वी झाले आणि त्याच आई-वडिलांना विसरून त्यांच्यापासून दूर झाले आहेत. सांगायचं तात्पर्य एवढचं की वडिलांना समजून घेणारे खूप कमी आहेत म्हणूनच की काय आज वृद्धाश्रमात जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
वडील काय असतात हे त्याला विचारा ज्याने लहानपणीच स्वतःच्या वडिलांला गमावून पोरका झाला असेल. बापाविषयी त्याच्याशिवाय कुणी सांगू शकत नाही की बाप नेमका काय असतो? कारण आयुष्याच्या प्रवासात ज्या ज्यावेळी बापाची उणीव भासते तेव्हा तेव्हा नक्कीच त्याच्या डोळ्यात पाणी येते आणि वाटतं बाप असता तर? पण हे दुःख तो कधी व्यक्त करू शकत नाही. कारण बाप नावाची सावली त्याच्यापासून दूर झालेली असते.
वडील कधीच आपल्या मुलांबद्दल चुकीचा विचार करत नाही. म्हणूनच नेहमी ते मुलांची काळजी करत असतात. मुलांच्या प्रत्येक सुखदुःखात सोबत असतात पण आजकालची दोन वर्ग जास्त शिकलेली पोर वडिलांना म्हणतात तुम्हाला काय समजतं? आम्ही मॉर्डन जमन्यातले आहोत. आम्हाला कळत काय योग्य अन काय चुकीचे आहे. त्यामुळे वडिलांच्या भावना समजून घेण्यासाठी आजचे पोर कमी पडत आहेत की काय यावर चिंतन आणि मनन करणे गरजेचे आहे.
वडिलांबद्दल उलट-सुलट बोलणं खूप सोपे आहे. परंतु कुटुंबाची जबाबदारी, मुलांच्या भविष्याची चिंता, मुलांमुलींचे लग्न, आरोग्य-शिक्षण या सर्वाचा ज्यावेळी विचार करू तेव्हा खऱ्या अर्थाने बाप समजून घेता येईल. कारण वडिलांनाच माहिती असते की या सर्वांसाठी काय करावे लागते आणि काय गमवावे लागते…म्हणून बाप समजून घेणं इतकही सोपं नाही. कारण प्रत्येकाला इथे बाप सुद्धा होता येत नाही.
मुलांच्या सवयी, इच्छा पूर्ण करण्यासाठी कधी-कधी वडिलांची ऐपत नसते तेव्हा वडील स्वतःच्या सवयी आणि इच्छा तोडून टाकतात पण मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तयार असतात. परंतु त्याच्या त्यागाची जाणीव सुद्धा आजकालच्या पोरांना नसते आणि ते पोरही म्हणून जातात ‘सगळेच वडील करतात तुम्ही काय आमच्यासाठी वेगळं करत नाही’… हे सगळं ज्यावेळी वडिलांच्या कानावर पडते तेव्हा मनातून जे दुःख होते ते दुःख वडील कधीच कुटुंबासमोर व्यक्त करत नाही कारण त्याचा परिणाम आपल्या मुलांवर होऊ नये म्हणून..
शेवटी सांगणे एवढेच की, जोपर्यत वडील आहे तो पर्यत त्यांना समजून घ्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःला घडवा. खूप मोठे व्हा. पण कधी वडिलांना विसरू नका. कारण ज्यावेळी दिशा दाखविणारा नसतो ना तेव्हा आयुष्याची दशा झाल्याशिवाय राहत नाही आणि ज्यावेळी आपल्या आयुष्यातुन बाप नावाची भिंत कोसळते ना तेव्हा तिथून सावरायला खूप काळ निघून जातो. अनेक मार्ग आपोआप बंद होऊन जातात आणि अगदी आयुष्यही अपुर पडत बाप समजून घेतांना…
-सुरज पी. दहागावकर
मुख्य संपादक, इंडिया दस्तक न्युज टीव्ही