नागपूर: आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या हायटेक प्रचाराला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आता काँग्रेस आहे. भाजपाच्या खोट्या, अपप्रचारास जशास तसे उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे सोशल मीडिया वॉरियर्स सज्ज असून भाजपच्या विभाजनवादी नीतीचा नक्कीच पराभव होईल. यात काँग्रेसच्या सोशल मीडियाचा महत्वाचा वाटा असेल, असे मत अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अलोक शर्मा यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागातर्फे वनामती येथे पूर्व व पश्चिम विदर्भातील कार्यकर्त्यांसाठी आयोजित एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शर्मा यांनी काँग्रेसच्या आत्तापर्यंतच्या सरकारांच्या कामगिरीबद्दल माहिती देत मोदी सरकारच्या लोकशाही विरोधी धोरणावर टीका केली. एकंदरीत काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे व विचारधारा सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यात सोशल मीडिया हे एक महत्वाचे माध्यम आहे. काँग्रेस पक्षाने सोशल मीडिया हा विषय अतिशय गांभीर्याने घेत त्यादृष्टीने तयारी सुरु केली आहे.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री, आमदार सुनील केदार, आमदार विकास ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोशल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष विशाल मुत्तेमवार, राष्ट्रीय समन्वयक नितीन अग्रवाल, आकाश तायवाडे, सुमित लोणारे आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी प्रास्ताविक करताना सोशल मीडिया ट्रेनिंगची भूमिका विषद करताना संपूर्ण राज्यभर काँग्रेस पक्षाची प्रशिक्षित टीम कार्यरत असल्याचे सांगितले.