राज्यात शिवसेनेचे मातब्बर नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंसोबत सर्व बंडखोर आमदार सध्या गुवाहटीमध्ये थांबले आहेत.
आपल्याकडे एकूण ४६ आमदारांचे समर्थन असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. शिवसेनेतील अनेक नेत्यांनी शिंदेंनी परत यावे, असे भावनिक आवाहनही केले होते. याशिवाय एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत सरकार स्थापन करावे, असा प्रस्तावही दिला होता. कालपासून आजपर्यंत राज्यात झालेल्या संपूर्ण राजकीय घडामोडींसंदर्भात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट ऑनलाईन पद्धतीने राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी ज्यांनी मी नको त्यांनी फक्त मला येऊन सांगावे, मी आत्ता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार, असे उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना उद्देशून म्हटले आहे.