-दिनेश मंडपे (नागपूर जिल्हा प्रतिनिधी)
नागपूर, दि. 3 : वसतिगृहाच्या गृहपालांनी आपल्या वसतिगृहाची तपासणी स्वत:च करावी काही समस्या असतील तर त्या सोडवाव्यात. प्रत्येक वसतिगृहाचे एक व्यवस्थापन अहवाल तयार करुन ते 15 ते 20 दिवसात आयुक्तालयास सादर करा. समाज कल्याण विभागातील सर्व शासकीय वसतिगृहे हे आतरराष्ट्रीय पातळीवरचे तसेच आदर्श वसतिगृहे म्हणून तयार करायचे आहे, असे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी बैठकीत सांगितले.
समाज कल्याण विभाग नागपूरचा आढावा घेण्यासाठी समाज कल्याण आयुक्त हे नागपूर दौऱ्यावर आले असता त्यांनी नागपूर व अमरावती विभागातील सर्व सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी व शासकीय वसतिगृहातील गृहपाल, गृहप्रमुख यांच्या समवेत बैठक घेतली. या बैठकीत उपस्थितांना शासकीय वसतिगृहाचा विकास करण्यासंदर्भात सूचना दिल्या. वसतिगृहातील प्रत्येक विद्यार्थी हा समाजासाठी एक आदर्श म्हणून तयार झाला पाहिजे यांची जबाबदारी तेथील गृहपालावर आहे. गृहपाल हे सामाजिक न्याय विभागातील महत्वाचा घटक आहे. आपल्या वसतिगृहातील सगळे रेकॉर्डस अद्यावत करा. स्टॉक बुक्स, सहा गठ्ठे पद्धतीनुसार सर्व रेकॉर्डस तयार करा. आपल्या वसतिगृहात आदर्श विद्यार्थी तयार व्हायला पाहिजे. याकरीता विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयींयुक्त योग्य व्यवस्था करा. जेवणासाठी योग्य पद्धतीने व्यवस्था करा. स्वच्छता ठेवा.
पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ. वॉटर ची व्यवस्था करा. आपल्या वसतिगृहाची तपासणी गृहपालांनी स्वत: करावी. काही समस्या असतील तर त्या आपल्या विभाग प्रमुखांमार्फत आयुक्तालयास कळवा. प्रत्येक वसतिगहात युपीएससी, एमपीएससी, स्टाफ सिलेक्शनचे वर्ग सुरु करा. प्रमुख वक्त्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करा. अशाप्रकारे सर्व सोयी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन द्या. अशा श्री. नारनवरे यांनी सूचना केल्या.
सर्व शासकीय वसतिगृहे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे तयार करण्यासाठी सर्वतोपरी उपयुक्त असे स्कील डेव्हलपमेंट चे क्लासेस घ्या. सामाजिक न्याय विभागातील सर्व वसतिगृहामध्ये आदर्श वसतिगृह स्पर्धेचे जिल्हा पातळी, विभागीय पातळी व राज्य पातळीवर आयोजन करु असे त्यांनी सांगितले. या बैठकीत समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, व दोन्ही विभागातील समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यावेळी उपस्थित होते.
00000