परवा पेपर वाचत असतांना एक बातमी दिसली. बातमीचे शीर्षक होत, “घरच्यांनी प्रेमविवाह करण्यास नकार दिल्याने जोडप्यांनी केली आत्महत्या” बातमीच फक्त टायटल वाचलं आणि विचार केला की, आजचे तरुण जगत कुणासाठी आहेत. जन्मदात्यांसाठी, समाजासाठी की काल परवा-भेटलेल्या एखाद्या व्यक्तीसाठी? या प्रश्नाचं उत्तर शोधतांना एक गोष्ट आठवली.
दोन वर्षांपूर्वीची गोष्ट..माझ्या मित्राचे एका मुलीसोबत प्रेम (आपल्या भाषेत लफडं) होत. दोघेही एकमेकांवर जिवापाड प्रेम करायचे. एकमेकांच्या सुख-दुःखात सोबत राहायचे, तासंनतास बोलत बसायचे, चुकून एखाद्या दिवशी कॉल किंवा मॅसेज आला नाही तर दोघेही बैचेन व्हायचे, त्याला ती आणि तिला तो सर्वकाही वाटायचा..दिवसा मागून दिवस जात होते. हळूहळू एकमेकांमध्ये ते एवढे गुंतून गेले की, काहीही झालं तरी नातं तुटणार नाही असं त्यांना वाटायचे, भविष्याचे स्वप्न रंगवू लागले पण जे नको व्हायला तेच झालं दोघेही करियरपासुन मात्र भटकले.
तीच लग्नाचं वय झालं, तिला बघायला पाहुणे येत होते आणि इकडे यानेही पंचवीशी ओलांडली होती. काय करावं, काय नाही? काही सुचेनासे झाले. प्रेम तर आहे पण घरी सांगणार तरी कसे? या विचाराने दोघेही चिंताग्रस्त झाले. कारण आमचं प्रेम आहे आम्हाला लग्न करायचं आहे असं तर म्हणता येतं नव्हतं. बरोजगार म्हणून सांगितलं तर आधीच पत्ता कट होणार होता. मग करायचं काय? दोघासमोर प्रश्नचिन्ह?
दोघेही विचार करत असतानाच तीच लग्न जुळलं आणि झालं सुद्धा.. इकडे मात्र याचं मन तुटलं. मग काय? तो आजही तिच्या आठवणीत माय-बापाच्या स्वप्नांचा चुराळा करत वणवण भटकत आहे. त्यांच्या प्रेमामध्ये नाही कुणाचं करियर बनलं, नाही स्वतःला तो सिद्ध करू शकला. ज्या स्वप्नांना घेऊन तो शहरात आला होता ती स्वप्ने आज काळासोबत गहाळ झाली.
याचा अर्थ असा नाही की, त्याच्याकडे टॅलेंटची कमी होती पण म्हणतात ना, मोबाईल असून चालत नाही तर त्यात चार्जिंग सुद्धा असायला हवी. अगदी तसच टॅलेंट असून चालत नाही त्याचा उपयोगही करता येणे आवश्यक आहे. पण सतत तो तिच्या विचारात राहत असल्याने आजही बेरोजगारचा शिक्का लावून गावभर हिंडतो आहे…
मग विचार करा मित्रांनो, ज्या विश्वासाने आपले आई-वडील आपल्याला बाहेर ठिकाणी शिकायला पाठवितात. वनमजुरी करून आपल्याला जगवितात, घडवितात त्याच आई वडिलांच्या कष्टाची जाणीव आज तरुणांना नसेल तर मग जगून उपयोग तरी काय?
प्रेम आंधळं असते म्हणे, पण एवढं आंधळं प्रेम? कधी कुणावर होऊ ही नये आणि कुणी करू ही नये..कारण जिथे आई- वडिलांच्या स्वप्नापेक्षा तिचे/त्याचे स्वप्न पडत असतील आणि करिअर बनविण्याच्या वयात करियरकडे दुर्लक्ष होत असेल तर असे प्रेम न केलेलं बरे! कारण तरुणपणी झालेलं प्रेम म्हणजे साध्या सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास माय-बापाला फसवून जिंदगी बरबाद करणे होय.
खरंतर माय-बाप या आशेवर असतात की माझा पोरगा/माझी पोरगी शिकून, अभ्यास करून खूप मोठी झाली पाहिजे. बापाला वाटतं पोरगं शहरात जाऊन लायब्ररीच्या खुर्च्या मोडत असेल पण इकडे होत काय? आज कित्येक पोरं नुसतं बापाच्या पैश्याचा गैरवापर करून प्रेमाच्या नावाखाली आयुष्याचा सत्यानाश करतांना आपल्याला दिसतील. म्हणून एवढंच सांगणं मित्रांनो प्रेम करू नका असं मी अजिबात म्हणणार नाही पण प्रेम करत असताना किंवा कुणाच्या जवळ जातांना आयुष्याचा कचरा होणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
-सुरज पी. दहागावकर
चंद्रपूर