गडचिरोली प्रतिनिधी सतीश कुसराम
गडचिरोली येथे संपन्न झालेला आदिवासी महाआक्रोश मोर्चा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल माजी आमदार तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
डॉ. होळी यांनी सांगितले की, “आदिवासी समाजाच्या अस्तित्व, हक्क आणि आरक्षण रक्षणासाठी घेतलेल्या या मोर्चात हजारोंच्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले. हा मोर्चा आदिवासी एकतेचा आणि स्वाभिमानाचा जाज्वल्य पुरावा ठरला आहे.”
ते पुढे म्हणाले की, या आंदोलनामुळे शासनाने आदिवासी समाजाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. समाजातील सर्व संघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकदिलाने सहभाग नोंदवून मोर्चा यशस्वी केला, ही आदिवासी समाजासाठी अभिमानाची बाब आहे.

यावेळी डॉ. होळी यांनी विशेषत: आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीचे पदाधिकारी, युवा वर्ग, महिलावर्ग आणि समाजातील ज्येष्ठ मंडळींना त्यांचा अखंड पाठिंबा, संघटनशक्ती आणि सामाजिक बांधिलकीबद्दल अभिनंदन व कृतज्ञता व्यक्त केली.
मोर्चाच्या यशस्वी आयोजनामुळे आदिवासी हक्क, पेसा कायदा, आणि आरक्षण रक्षणाच्या लढ्यात नव्या उर्जेचा संचार झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी आदिवासी आरक्षण कृती समितीचे सदानंद ताराम, देवराव आलाम, गुलाबराव मडावी, आनंद मडावी, उमेश उईके, सुरज मडावी आदी उपस्थित होते.







