गोंडपिपरी: तालुक्यातील सकमुर गावच्या पाणीपुरवठा योजनेतून गावाजवळील जवळपास सात गावांना पाणीपुरवठा केला जातो. पण मागील २ दिवसापासून ठेकेदाराच्या बेजबाबदारीमुळे पाणीपुरवठा ठप्प आहे. त्यामुळे सातही गावातली नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
मार्चच्या सुरुवातीलाही पाणीपुरवठा बंद झाला होता. त्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत केल्यावर जवळपास २० दिवसानंतर पुन्हा मोटारी खराब झाल्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला. खरं तर गावच्या पाण्याच्या मोटारी दर १५ ते ३० दिवसात जळतात. ह्या गोष्टीला बरोबर एवढाच कालावधी लोटला. म्हणजे ठेकेदारांच्या नाकर्तेपणा मुळे दर १५ ते ३० दिवसाच्या फरकाने गावातील पाणीपुरवठा योजनेला खीळ बसेल हे निश्चित. कमी प्रतीच्या मोटारी बसवून, निकृष्ट दर्जेचे काम केल्यामुळेच ही समस्या वारंवार गावकऱ्यांसमोर उभी ठाकते. आता कितीदिवस पाण्याची वाट पाहावी लागणार, हा गंभीर प्रश्न आहे.
गावातील सर्व वार्डात टँकरनी पिण्याच्या पाण्याचे वाटप स्थानिक प्रशासन करतील, ही आगाऊ अपेक्षा सर्व गावकरी बाळगून होते. पण स्थानिक प्रशासन हात वर करताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा १ किलोमीटर अंतरावरून नदीवरून, टाकीवरून डोक्यावर पाणी आणल्याशिवाय गावातील नागरिकांना पर्याय नाही.
कुणीकुणी बैलबंडीवरून टाकीतून तर पीकअप वरून ३ किमी असलेल्या वेडगाव गावातून पाणी आणताना दिसत आहे. स्थानिक प्रशासन आणि पाणीपुरवठा समितीच्या समन्वयातून यशस्वी नियोजन करून लवकरात लवकर पाणीपुरवठा पूर्ववत करावे, अशी सकमुर गावातील गावकऱ्यांनी मागणी करत आहे.