HomeBreaking Newsचंद्रपुर जिल्हातील अनेक गावांत वाहतोय दारूचा महापूर; गुंतले दारू व्यवसायात अनेक तरूण...

चंद्रपुर जिल्हातील अनेक गावांत वाहतोय दारूचा महापूर; गुंतले दारू व्यवसायात अनेक तरूण बेरोजगार…

चंद्रपूर/तळोधी (बा.) अप्पर तालुका पोलिस स्टेशन तळोधी अंतर्गत येत असलेल्या जवळपास ४२ गावांपैकी सावरगाव, तळोधी, नांदेड, बाळापूर, गोविंदपूर, वाढोणा या गावांसह या परिसरात अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. ही दारू बनावटी असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

मात्र, याकडे तळोधी पोलिस स्टेशनचे दुर्लक्ष होत असून अवैध दारूविक्रेत्यांविरोधात कार्यवाही करण्यासाठी ठाणेदारांनी चुप्पी साधल्याने या भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ रोजी दारूबंदीची घोषणा केली. औद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची विशेष ओळख आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातून शासनाला मोठा महसूलही प्राप्त होत होता. शिवाय अनेक लहान मोठे व्यवसाय मद्य विक्रीवर अवलंबून होते. दारुबंदीची सहा वर्षापूर्वी तातडीने अंमलबजावणी ही करण्यात आली. मात्र, तेवढ्याच वेगाने जिल्ह्यात अवैधरित्या बनावट दारूची तस्करी सुरू झाली. अनेक कलुप्त्यांचा छुपा वापर करून आजूबाजूच्या जिल्ह्यातून दारू मुबलक प्रमाणात येऊ लागली.

तर काही गब्बर दारू विक्रेते स्वतः बनावट दारू निर्माण करून कमी भावात विकण्याचा गोरखधंदा सुरू केला असून नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा एक अघोरी प्रयोग अलीकडे सुरू झालेला आहे. प्लास्टिकच्या छोट्या बाटलीमध्ये ही बनावट दारू मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहे. शिवाय काही गावांमध्ये मोहफुलांची बनावट दारूही विकल्या जात आहे. या दारूमध्येसुद्धा वेगवेगळ्या विषारी वस्तू टाकण्यात येतात. यामुळे स्लो पॉयजन युक्त बनावटी दारू पिल्याने सावरगाव, तळोधी, नांदेड, बाळापूर, गोविंदपूर,

कोजबी, वाढोणा आदी परिसरातील अनेक तरुण दारूच्या अतिसेवनाने किडनी, लिव्हर निकामी होऊन पोटाचा जलपंडू होवून मृत्युमुखी पडले आहेत. मात्र पोलिसांच्याच आशीर्वादाने या भागातील पंधरा ते वीस गावाच्या बाहेर ठिय्ये बसवून सर्रास अवैध दारू विक्री सुरू आहे. यामध्ये तळोधी हे मुख्य केंद्र बनले असून गावाच्या चारही दिशेला चार ठिय्यावर बिनधास्त अवैध दारू विक्री सुरु आहे. मात्र अशा दारू विक्रेत्यांवर व दारू तस्करांवर पोलिस विभागाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

अनेक बेरोजगार तरुण गुंतले दारू व्यवसायात

या भागातील अनेक बेरोजगार तरुण, विद्यार्थी दारूच्या व्यवसायात गुंतले आहेत. तर काही दारूच्या आहारी जाऊन स्वतःचे आयुष्य उद्धवस्त करीत आहेत. यामध्ये सदर गावांतील तंटामुक्त समित्यांही निष्क्रिय कार्य करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गावांतील शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर पडला आहे.

 

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!